टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात मागील काही दिवसांपासून तर नविन कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त आढळत आहे. इतकेच नव्हे तर १५ दिवसांत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचीही संख्या तिपटीने वाढली आहे. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण रंगले आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली आहे. या बदलीचे स्वागत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हान यांनी केले आहे. तर काळे यांच्या बदली विरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. काळेंची बदली करुन ठाकरे सरकारने सूडाचा कळस गाठल्याचा घणाघात भातखळकरांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाडांकडून निर्णयाचे स्वागत
महाराष्ट्र अडचणीत असताना स्वत:च्या परीने महाराष्ट्राला मदत केली नाही. उलट संभ्रमाचे वातावरण निर्माण केले. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही मी कारवाईबाबत सांगितले आणि त्यांनी होकार दिला. मुजोर अधिकाऱ्यांना बाजूला करणे योग्यच असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे ही धमकी नाही. इतर अधिकाऱ्यांनी काय समजायचे ते समजा. का कारवाई झाली, कशामुळे झाली याबाबत मी बोलणार नाही, असेही आव्हाडांनी म्हटले आहे.
अभिमन्यू काळे ह्यांच्या वर कारवाई केल्या बद्दल मुख्यमंत्री ह्यांचे आभार
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 20, 2021
महाराष्ट्र अडचणीत असताना हे फोन बंद करुन बसतात. मुजोरच होता तो, मी शब्द मागे घेणार नाही. ऑक्सिजन नाही आणि फोन लावला तर फोन बंद. माझ्यातला कार्यकर्ता अजून मेला नाही. नोकरशाह आणि सत्ताधारी एकत्र चालायला हवे, अशी अपेक्षाही आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, अभिमन्यू काळे यांच्या बदलीवरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘रेमडेसीवीरसाठी भाजपला पत्र देणाऱ्या FDA आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली करून ठाकरे सरकारने सूडाचा कळस गाठला आहे. महाराष्ट्राचे हित गेले चुलीत, टक्केवारी शिवाय काहीच यशस्वी होऊ द्यायच नाहीत असा निश्चय ठाकरे सरकारने केला आहे”, असे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे.
रेमदेसीवीरसाठी भाजपला पत्र देणाऱ्या FDA आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली करून ठाकरे सरकारने सूडाचा कळस गाठला आहे. महाराष्ट्राचे हित गेले चुलीत, टक्केवारी शिवाय काहीच यशस्वी होऊ द्यायच नाहीत असा निश्चय ठाकरे सरकारने केला आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 20, 2021