नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं ईडीचं लचांड लागलं होतं.(Ajit Pawar made fun of Rohit Pawar’s tears) स्वतःला आलेली ही अवकळा पाहून अजितदादा बहुधा नैराश्यात गेले होते. अजितदादांच्या ईडी कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजू लावून धरली होती. पण अजितदादा हा मुळातच घाबरट माणूस. त्यांचा दम फक्त आवाजातच दिसतो. ईडीचं नाव निघतांच ते शेपूट घालतात. हातात सत्ता नसेल तर ते म्याव मांजर सुद्धा होतात. हे अख्ख्या महाराष्ट्राला ठावूक आहे.
ईडीच्या अशा नोटीसा पाठविण्याचा कार्यक्रम सुरू असताना भाजपच्या नेते मंडळींना नको ती उपरती सुचली, अन् त्यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला. भाजपने त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजेच ईडीला कामाला लावलं. ईडीनं शरद पवार यांना नोटीस धाडली. खरंतर ही नोटीस शरद पवारांपर्यंत पोचलीच नाही. ती अगोदर मीडियामध्ये गेली. मीडियामध्ये त्याच्या बातम्या आल्या. शरद पवारांनी या संकटातही मोठी संधी शोधली, आणि ईडीचा पुरता पचका करून टाकला. भाजपवरच त्यांनी गेम उलटवला.तो दिवस मला आजही लख्खपणे आठवतोय.
ईडीनं नोटीस पाठवलीय तर मग मी ईडीच्या कार्यालयात स्वतःच पाहुणचार घ्यायला जातो. शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही.मी त्या बँकेशी संबंधित कुठल्याच पदावर नव्हतो. तरीही माझ्या नावाने ईडीनं नोटीस काढली, अन् ती मीडियाकडे पाठवलीय. त्यामुळं हे प्रकरण समजून घेण्यासाठी मी स्वतःहूनच ईडीच्या कार्यालयात जातो, अशी शरद पवारांनी भूमिका जाहीर केली.या भूमिकेमुळं झालं काय की, अख्ख्या महाराष्ट्रात शरद पवारांविषयी सहानुभूतीची लाट उसळली. आपल्या मलबार हिल येथील घरातून शरद पवार १० वाजता निघणार होते. पण त्या अगोदर महाराष्ट्रातील जनता पेटून उठली होती.