जान्हवी सराना या एचआर मॅनेजरने अलीकडे लिंक्डिनवर पोस्ट केलेल्या नोकरी भरतीच्या जाहीरातीवरून सोशल मिडियावर चांगलीच नाराजी पसरली होती.(Marathi manus no Job in Mumbai) गुजरातमधील फ्रीलान्स एचआर रिक्रूटर अणि सल्लागार यांनी ग्राफिक डिझायनरच्या भुमिकेसाठी मुंबईत नोकरीची जागा शेअर केली होती. पण त्यात मालकाची अट होती की, इथे मराठी लोकांचे स्वागत केले जाणार नाही, यामुळे सोशल मिडियावर वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान संबंधित एचआर मॅनेजरने माफी मागितली आहे. सोशल मीडिया नेटक-यांनी नोकरीच्या जाहीरातीवरून मोठ्याप्रमाणात टीका देखील केली होती. १ मे म्हणजेच आपला महाराष्ट्रराज्य स्थापना दिवस साजरा करून मोजके काही दिवस झाले ही नाहीत नि आपल्या महाराष्ट्रातच मराठी माणसाचं अस्तित्व नाकारणारी ही घटना समोर आली. पण हि पहिलीच घटना नाहीये. आपल्याच भूमित गेली कित्येक दशकं मराठी माणूस असे कटू अनुभव घेताना दिसतोय. याचसाठी का संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अट्टाहास केला होता.
एकीकडे वेदांता, फॉक्सकॉन सारखे प्रकल्प महाराष्ट्राला डावलून गुजरातकडे वळत असताना अशा प्रकारच्या घटना समोर येत असतील तर ही परिस्थिती मराठी माणसाच्या प्रगतीसाठी किती अनुकूल आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या ब-याच टिका आता सोशल मिडियावर पहायला मिळताहेत. आता गंमत म्हणजे हि जाहीरात देणारी कंपनी आहे, गिरगाव भागातील आहे जिथे मोठ्याप्रमाणात मराठी माणसं रहिवासी आहेत. दिवसेंदिवस परप्रांतियांची संख्या वाढत असताना मराठी माणसाला अशी वागणूक मिळणं काय दर्शवतं. कधी कुणाला घर देण्यास नाकारलं जातं, काही ठिकाणी मराठी बोलण्याची परवानगी नसते, ब-याचदा खरेदीच्या ठिकाणी मराठी ग्राहकांना दुय्यम वागणूक दिल्याचे प्रकारही अनेकदा समोर आलेले आहेत. परप्रांतियांचे लोंढेच्या लोंढे रोज मुंबईत स्थिरस्थावर होत असताना मराठी माणसाला नाकारून कुठली खेळी खेळली जातेय.
मुंबईच्या या सत्ता राजकरणाची झळ मुंबईत राहणा-या मराठी माणसाला नेहमीच सोसावी लागली आहे. या घटनेत एचआर मॅनेजर जान्हवी सराना हीने तिच्या या चूकिची माफी मागत,माफीनाम्यात नमूद केले आहे कि, मी मनापासून माफी मागते, काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनरसाठी एक पोस्ट टाकली होती आणि एका आक्षेपार्ह वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. ज्यात कोणशीही भेदभाव केला जातो, अशा भूमिकेचे मी समर्थन करत नाही. हे माझ्या नजरचूकीमुळे झाले आहे., आता हि एक घटना असली तरी अशा घटना सातत्याने घडू नयेत यासाठी कोण पुढाकार घेणार. कि निवडणूकीच्या धामधुमीत या विषयाला देखील मतदारांना भूलवण्यासाठी केवळ काही काळापुरतंच महत्त्व दिलं जाईल.