35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्यBreaking : राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद, दहावी - बारावी वगळून सर्व...

Breaking : राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद, दहावी – बारावी वगळून सर्व परीक्षा रद्द

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील शहरांसह ग्रामीण भागातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विद्यापीठ स्तरावरील सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. पण दहावी – बारावीच्या परीक्षांमध्ये मात्र कोणताही बदल केलेला नाही.

करोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. या क्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, मुख्य सचिव अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त असली तरी ती काही गुन्हेगार नाही. तिला योग्य औषधोपचार आणि मानसिक आधारही द्या. राज्यात लागू असलेला साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात. नागरिकांमध्ये भीती आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. राज्यात जे रुग्ण दाखल आहे त्यातील उपचाराला प्रतिसादही देत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नियम सर्वांना सारखे असून धार्मिक सण-उत्सव, समारंभांसोबतच राजकीय कार्यक्रमांनाही परवानगी देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. परदेशातील टुर्सना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्य शासन कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी सर्तक रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

कोरोनाचा प्रार्दुभाव पसरु नये याकरिता राज्यातील सर्व धार्मिक उत्सव रद्द करावेत. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळांमध्ये दैनंदिन पूजाअर्चा व धार्मिक विधी शिवाय भाविकांसाठी तेथे प्रवेशास काही दिवस प्रतिबंध करावा. व्यापक जनहित लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याचा वापर प्रभावीपणे करावा. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात. ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहे. कोरोनाच्या आपत्कालीन उपाययोजनांसाठी तातडीचा निधीचा पहिला हप्ता म्हणून 45 कोटी रुपये विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असून ज्या प्रवाशांना घरी राहून क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना दिल्या आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यासर्व कारवाई करताना त्याला मानवी चेहरा असावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

यावेळी घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय असे

· राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या.

· ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवणार.

· कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक 5 कोटी रुपये असे 45 कोटींचा पहिला हप्ता देणार.

· क्वॉरंटाईन सुविधा असलेल्या ठिकाणी दूरचित्रवाणी, कॅरमबोर्ड, जेवण आदी सुविधा द्या.

· ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहे त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल.

· केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.

· आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार.

· उद्यापासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय.

· नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी.

· होम क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.

· धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा.

राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३९ : राजेश टोपे

राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ करोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. राज्यात १०८ लोक विलगिकरण कक्षात दाखल असून १०६३ होम क्वारंटाईन असून त्यापैकी ४४२ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
यवतमाळ येथे करोना बाधित आढळलेली ५१ वर्षाची महिला ही दुबई सहलीला गेलेल्या चमूतील आय टी तज्ञाची आई आहे. ती स्वतः ही दुबई सहलीमध्ये सहभागी झाली होती. यामुळे यवतमाळ येथे आढळेल्या रुग्णांची संख्या ३ झाली आहे. दुबईला गेलेल्या ४० जणांच्या चमूतील एकून १५ जण करोना बाधित आढळले असून २२ जण निगेटिव्ह आढळले आहेत. या चमूतील बेळगाव येथील ३ जणांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरात विलग करण्यात आले आहे.
आज करोना बाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता, तो फिलिपाईन्सचा नागरिक आहे. आजपर्यंत फिलिपाईन्सहून नवी मुंबईत आलेल्या या १० जणांच्या चमूतील ३ जण करोना बाधित आढळले असून इतर ७ जण करोना निगेटिव्ह आढळले आहेत.
पिंपरी चिंचवड मनपा ९, पुणे मनपा ७, मुंबई ६, नागपूर ४, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण ३, रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी १ असे एकूण ३९ रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात आज ३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. १६ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६६३ विमानांमधील १लाख ८९ हजार ८८८ प्रवासी तपासण्यात आले आहेत.
राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण १०६३ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ७९४ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे

राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी