टीम लय भारी
मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खबरदारीच्या उपाययोजनांसाठी तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी अनेक महत्त्वाची पावले टाकली आहेत. मुंबईत कोणत्याही परिस्थितीत नव्या कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून सर्वती खबरदारी (Alert in Mumbai) घेतली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
आयुक्त चहल यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. कोरोनाचा नवा विषाणू कोणत्याही परिस्थितीत येथे येऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. उद्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनंतर ब्रिटनमधून येणा-या विमानांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात एकूण पाच विमाने लंडनमधून मुंबईत येणार आहेत. त्यातून साधारण १ हजार प्रवासी उद्यापर्यंत मुंबईत येतील. या सर्व प्रवाशांना सक्तीने सरकारी क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत विविध हॉटेल्समध्ये आम्ही २ हजार रूम्सची व्यवस्था केली आहे, असे चहल यांनी सांगितले. ब्रिटनमधून येणा-या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करण्यात येईल.
जो प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याला तिथून थेट सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असेही चहल यांनी नमूद केले. युरोपातील अन्य देश व आखातातील देशांतून येणा-या प्रवाशांसाठी सात दिवसांचे सक्तीचे क्वारंटाइन असेल. हे क्वारंटाइन संपण्याआधी त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येईल. ती निगेटिव्ह असेल तरच त्या प्रवाशाला घरी सोडले जाईल, असेही चहल यांनी नमूद केले. युरोप व आखात सोडून अन्य देशांतून येणा-या प्रवाशांसाठी होम क्वारंटाइन बंधनकारक असेल, असेही ते म्हणाले.