संपूर्ण भारतभरात सध्या राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ जोरदार सुरू आहे. एकुण 3500 किमीचा प्रवास करत राहुल गांधी संपूर्ण भारतभार्मण करणार आहेत. आता या भारत जोडो यात्रेला भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेचे निमंत्रण स्वीकारले आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार अमरनाथ राजूरकर यांनी आज एका शिष्टमंडळासह मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांची भेट घेतली. काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, आपणही या यात्रेत सहभागी व्हावे, असे निमंत्रण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उभय नेत्यांना दिले. दोहोंनीही हे निमंत्रण स्वीकारले असून, शरद पवार स्वतः तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा
Smita Patil : स्पॉट बॉयच्या घरासाठी पर्समधून पैसे काढून देणारी ‘स्मिता पाटील’
भारत जोडो यात्रेला देशभरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असून, दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने (ठाकरे गट) यात्रेत सहभागी होण्यास सहमती दिल्याने त्याचे महत्व अधिक वाढले आहे. खासदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम, महाराष्ट्राचे सहप्रभारी बी.एम. संदीप, आमदार सुधीर तांबे, आबा दळवी यांचा समावेश होता.
दरम्यान नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल. यावेळी कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन पक्षांची मिळून असलेल्या महाविकास आघाडीची एकत्रित ताकद पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाय या भारत जोडो यात्रेत एकत्रित आलेल्या महाविकास आघाडीलाही आगामी काळात असे एकत्रित उपक्रम राबवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो असे भाकित वर्तवले जात आहे.