टीम लय भारी
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासाठी विशेष स्पेशल खुर्ची मागवण्यात आली होती. मात्र अन्य मंत्री आणि पाहुण्यांना बसायला साधी खुर्ची होती. हे चाणाक्ष मुख्यमंत्री ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी आधी मोठी खुर्ची हटवून त्याठिकाणी साधी खूर्ची ठेवण्यास आयोजकांना सांगितले. त्यानंतरच ते अन्य मंत्रीगणासोबत कार्यक्रमात विराजमान झाले. यामुळे उपस्थितांना भारावून आले. मात्र ऐनवेळी खूर्ची बदलायला लावल्याने आयोजकांची एकच तारांबळ उडाली.
औरंगाबादेत विविध विकासकामांच्या भूमिपूजनावरून सुरु असलेल्या राजकारणाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी उत्तर दिले आहे. ते शनिवारी (दि. 12) भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
व्यासपीठावर आगमन होताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्यासाठी ठेवलेली मोठी खुर्ची हटवून इतर मान्यवरांसाठी असलेली साधी खुर्ची ठेवायला सांगितले. ती ठेवल्यावर ते खुर्चीत बसले. यातून आपण वेगळे नाही, आपणही सामान्य आहोत, असा संदेश मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कृतीतून पाहायला मिळाला.
यावेळी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, हरीभाऊ बागडे, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत पाण्याचा प्रश्न, गुंठेवारीचा, सिडकोतील घरांच्या मालकीचा प्रश्न आदीवर चर्चा होते. ती सोडवायला सांगितले आहेत. आणखी काय करू शकतो याबाबत डोक्यात आकृतीबंध तयार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक त्यांच्या लाडक्या शहरात होत आहे, असे स्मारकाविषयी मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्गार काढले. हिंदुत्व, राष्ट्रीयत्वाचे विचार स्मारक पाहिल्यानंतर नव्या पिढीला कळतील, असे ते म्हणाले.