टीम लय भारी
मुंबई : ‘कोरोना’चे ( Coronavirus ) संकट पाहता विधानपरिषदेची निवडणूक होणार नाही. परंतु विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त दोन सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी एका जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे हे सध्या आमदार नाहीत. मंत्रीपदावर आलेली व्यक्ती जर आमदार नसेल तर त्यांना सहा महिन्याच्या आता आमदार व्हावे लागते अशी घटनात्मक तरतूद आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सहा महिने पूर्ण होणार आहेत. तत्पूर्वी त्यांना कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व मिळविणे गरजेचे आहे.
‘कोरोना’मुळे ( Coronavirus ) राज्यसभेच्या तसेच विधानपरिषदेच्या निवडणुका रद्द झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विधानपरिषदेचे सदस्य कसे होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांना सदस्यत्व मिळाले नाही तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे सगळ्या मंत्रीमंडळालाच राजीनामा द्यावा लागतो.
मुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळ सदस्यत्वावरून उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. त्यावर आता सरकारने उपाय शोधला आहे. मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नियुक्त आमदार केले जाणार आहे.
आर्थिक पुनरुज्जीवनासाठी दोन समित्या
- आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाच्या ( Coronavirus ) संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. या संदर्भात दोन समित्या नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
पहिली समिती ही आर्थिक परिणामांचा पुनरुज्जीवन अहवाल तयार करेल. यात अर्थतज्ज्ञ, उद्योजक, निवृत्त अधिकारी, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असेल.
याशिवाय दुसरी समिती ही मंत्रिमंडळातील सदस्यांची असून त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, अनिल परब यांचा समावेश असेल.
सर्व विधिमंडळ सदस्यांच्या वेतनात 30 टक्के कपात
- कोरोनाच्या ( Coronavirus ) पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात या महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2020 पासून पुढील वर्षीपर्यंत म्हणजे एप्रिल 2021 पर्यंत 30 टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय झाला.
ध्वजारोहण साधेपणाने करणार
- 1 मे रोजी, महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात होणारे ध्वजारोहण हे केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी व निवडक मान्यवरांच्या उपस्थितीतच होईल. कुठलाही समारोह किंवा परेड होणार नाही असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
निवारा केंद्रांमध्ये भोजनाची क्षमता वाढविणे
- कोरोना ( Coronavirus ) संदर्भात राज्यातील वाढते रुग्ण लक्षात घेता लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक करण्याबाबत तसेच निवारा केंद्रांमध्ये भोजन, शिवभोजन यांची क्षमता अधिक वाढविणे व लाभार्थी नागरिकांना अधिक चांगली सुविधा देणे. याबाबत मंत्रिमंडळातील सदस्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या, याची देखील काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा
#Covid19India : उद्धव ठाकरेंच्या ट्विटवर हृतिक रोशन, सोनम कपूर, अनुराग काश्यप, परिणीती चोप्राने व्यक्त केली भावना, अंधभक्ताने त्यांनाही ठरविले ‘विकाऊ’ https://t.co/AoAZsvFTOZ@OfficeofUT @CMOMaharashtra @anuragkashyap72 @sonamakapoor @sachin_inc @FarOutAkhtar @iHrithik
— Lay Bhari (@LayBhari3) April 9, 2020
हे सुद्धा वाचा
Covid19 : उद्धव ठाकरे : मोदी सरकारकडून धान्याचा तुटपुंजा पुरवठा, महाराष्ट्राकडून मात्र जास्त पुरवठा