दरवर्षी पेक्षा यंदा पाऊस खूप उशिरा हजर झाला आहे. पण पावसाचे दणक्यात आगमन झाले आहे. पावसाच्या या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. उशिरा का होईना, पाऊस सुरू झाल्याने बरेच दिवस आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या जीवाला दिलासा मिळाला आहे. असे असतानाच शेतकऱ्यांची पेरण्यापूर्वी मशागतीसाठी आणि पेरणीसाठी लागणारी बियाणे, खते, औषधांच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी कंबर कसली आहे. साधारपणे 15 जूनपर्यंत मोसमी पाऊस राज्यात दाखल होतो आणि पुढे वाटचाल करतो, पण यंदा 25 जूनची वाट पाहायला लागली. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीपुर्व आणि पेरणीची सर्व काम खोळंबली होती. पण आता पावसाचे आगमन झाले असून राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे.
शेतकऱ्यांची पेरणीपुर्व मशागतीसाठी शेतीशिवारात वर्दळ वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या उन्हाळी मशागती झाल्या आहेत. त्यांची पावले बियाणे, खते, औषधांच्या खरेदीसाठी कृषीसेवा केंद्राकडे वळत आहेत. पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास शेतकरी घाई करून पुढील 15 दिवसातच पेरण्या उरकून घेतील अशी स्थिती आहे. राज्यात खरीप हंगामामध्ये 151 लाख हेक्टरवर पेरणी होते. सरासरी तृणधान्यची पेरणी 34, कडधान्याची पेरणी 21, कापसाची पेरणी 42, तेलबियांची 43 लाख क्षेत्रावर पेरणी होते. ऊसाची लागवड सुमारे 11 लाख हेक्टरच्या घरात असते. ह्यावर्षी 25 जून अखेरीस राज्यात सरासरी 10 टक्याहून कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
हे सुध्दा वाचा:
ठाण्यातील अर्ध्या डझन प्रकल्पाचे रविवारी मुख्यमंत्रांच्या हस्ते लोकार्पण….
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण; संत एकनाथ महाराजांची पालखी सोलपूरात
मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनवण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांचे आव्हान
दरवर्षी ७ जूनला राज्यात पाऊस पडायचा, पण आता मानवी हव्यासामुळे निसर्गाने कूस बदलली आहे. त्यामुळे शेतीचे गणितच बिघडत चालले आहे. राज्यात एकेकाळी शेतीचे प्रमाण ७५ टक्के होते. पण वाढते शहरीकरण, बेभरवशाचा पाऊस, नापिकी यामुळे शेती क्षेत्र दिवसेंदिवस कमी कमी होत चालले आहे. त्यात यंदा पाऊस पडायला 23 जून उजाडले. त्यामुळे राज्यातील अनेक भागात खरिपाची पेरणी रखडली आहे. पर्यायाने यंदा विविध पीक येण्यास वेळ लागणार आहे.