34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रफॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर लस कमी पडली नसती : उदयनराजे भोसले

फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर लस कमी पडली नसती : उदयनराजे भोसले

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात कोरोना लसींचा केवळ दोन दिवस पुरेल, इतकाच साठा उपलब्ध आहे. राज्यात अनेक ठिकाणी लसींचा साठा संपल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. देशात लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे. लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

उदयनराजे भोसले गुरुवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून लादण्यात आलेल्या कोरोना निर्बंधांविषयी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांची बाजू उचलून धरली. मी व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असते तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असे उदयनराजे भोसले यांनी ठणकावून सांगितले.

सध्या वातावरणात अनेक व्हायरस आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. लोकांनी पहिल्या लॉकडाऊनवेळी ऐकले. आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. उद्या बँका हप्ते भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्यावी. कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसेल तर व्यापारी कसे ऐकणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

कोरोना व्हायरस फक्त शनिवारी-रविवारीच येतो का?

शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवायला कोरोना व्हायरस फक्त तेव्हाच बाहेर येतो का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला. राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या व्यथा सारख्याच आहेत. माणूस जगण्याची गॅरेटी कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच मार्ग आहे. मृत्यूचे प्रमाण पाहता प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो, अशा माझ्या सदिच्छा असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

‘भिडे गुरूजींविषयी मला विचारू नका’

संभाजी भिडे यांनी गुरुवारी राज्य सरकारच्या निर्बंधांवर टीका केली होती. याविषयी उदयनराजे भोसले यांना विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले की, माझे प्रश्न मला विचारा. कोण काय म्हणाले ते मला विचारू नका. ते ज्या अँगलने बोलले त्यांनाच माहिती आहे. हवे तर मी त्यांच्याशी चर्चा करून बोलेन, असे उदयनराजे यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी