सातपूर- त्र्यंबकेश्वर मुख्य रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी अचानक टाकण्यात आलेल्या स्पीडब्रेकर मुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. हे स्पीड ब्रेकर अपघाताला निमंत्रण ठरत असून या स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. सातपूर त्र्यंबक मुख्य रस्त्यावरील उज्वल एजन्सी, सातपूर पोलीस ठाणे सर्कल, विक्टर पॉईंट अपघात स्थळ बनले आहे. गेल्या वर्ष दोन वर्षात या ठिकाणी अनेक अपघात झाले आहे. अनेकांना प्राण गमवावे लागले आहे तर अनेकांना कायमस्वरूपी जायबंदीसं सामोरे जावे लागले आहे. या ठिकाणी गतिरोधक बसावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत होती.
त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहे. मात्र मुख्य रस्त्यांवर गतिरोधक, बाजूपट्टी, दुभाजक, झेब्रा क्रॉसिंग आणि दिशादर्शक रेषा अद्याप काढलेले किंवा पांढऱ्या रंगाने रंगवलेले दिसत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. कालपर्यंत गतिरोधक नसलेल्या जागेवर अचानक समोर गतिरोधक दिसल्याने वाहनधारक अचानक ब्रेक मारतात. त्यामुळे मागील वाहन पुढील वाहनावर धडकत असल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील गतिरोधकाच्या ठिकाणी पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी लखीचंद पाटील यांच्यासह वाहनधारकांयांनी केली आहे.