टीम लय भारी
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल (Gram Panchayat Election ) वाजल्यानंतर शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress), भाजप (BJP) या पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच आता मनसेने (MNS) उडी घेतली आहे. मनसेने देखील संपूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सज्ज व्हा, असा आदेशच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यांच्या आदेशाने मनसे ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी जाहीर केले आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूका पार पडल्यानंतर आता ग्रामपंचायत (Gram Panchayat Election ) निवडणूका जाहिर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 15 जानेवारी 2021 रोजी राज्यातील सर्व ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका पार पडणार आहेत.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायती निवडणुकांसाठी सज्ज व्हा; सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार ! #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/Vokyjx4Esk
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 14, 2020
राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या सर्व ठिकाणी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होतील.
निवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे – 15 डिसेंबर
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत – 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
उमेदवारी अर्जाची छाननी – 31 डिसेंबर
उमेदवारी अर्ज माघार व चिन्ह वाटप – 4 जानवेरी
मतदान – 15 जानेवारी (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30)
मतमोजणी – 18 जानेवारी
निवडणूक निकालाची अधिसुचना प्रसिद्धी – 21 जानेवारीपर्यंत