टीम लय भारी
मुंबई : राजू शेट्टी (Raju Shetty) यांचे नाव विधानपरिषदेसाठी निश्चित झाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील काही नेते नाराज आहेत. अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. घरच्या कट्यारीचे घाव जिव्हारी लागतात. एका विधान परिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही आमदारकी आम्हाला नकोच, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
अनेकांचे वार झेलले, पण इतका जखमी कधीच झालो नव्हतो. घरच्या कट्यारीचे घाव जिव्हारी लागतात. ‘स्वाभिमानी’ हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधान परिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच, असं राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव विधान परिषदेसाठी निश्चित झाल्यावर पक्षातील काही नेते नाराज आहेत. जालंदर पाटील आणि सावकार मदनाईक यांनी नाराजी व्यक्त केली.
राजू शेट्टी काय म्हणाले?
राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत त्यापैकी एका जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन मी स्वत: जर उमेदवारी स्वीकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही, असे आघाडीच्या नेत्यांचे मत होते. आम्ही विचार करुन कळवतो असा उलटा निरोप मी त्यांना दिला व पक्षाचे सरचिटणीस डॉ. महावीर अक्कोळे यांना राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलावण्यास सांगितले, असे राजू शेट्टी म्हणाले.
जिल्ह्यातील सदस्यांनी प्रत्यक्ष जमावे आणि इतर सदस्यांशी फोनवरुन चर्चा करावी असे सुचवले. 12 जून रोजी डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीस राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकार मदनाईक, पक्षाचे अध्यक्ष जालंदर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते व इतर सर्व सदस्यांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे मत आजमावले गेले आणि एकमताने आघाडीचा प्रस्ताव स्वीकारण्याचे ठरले, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.
माझ्या नावाबाबत चर्चा होणार होती, म्हणून पदाधिका-यांना मोकळेपणाने चर्चा करता यावी या उद्देशाने मी जाणीवपूर्वक या बैठकीला गैरहजर राहिलो. तरीही सर्व पदाधिका-यांनी माझ्या नावाबाबत एकमत केले व तसा आघाडीच्या नेत्यांना निरोप पाठवण्यास सांगितले. तो निरोप घेऊन मी 16 जून रोजी आघाडीचे नेते शरद पवार यांना पक्षाचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांच्यासह भेटलो व होकार कळवला, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.