कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी दरवाडल्यानंतरही सीमाप्रश्नी कन्नडिंगांच्या माजाविरोधात शेपूट घालून बसलेले, मूग गिळून गप्प बसलेले राज्याचे अनेक मंत्री आज अचानक बोलू लागले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नामर्द, षंढ सरकार म्हणताच, सीमाप्रश्नी पुचाट भूमिका घेणारे भाजप व शिंदे गटाचे मंत्री आता फक्त बोलण्यात मर्द बाणा दाखवू लागले आहेत. कानडी बोम्मईविरोधात बोलण्याची मात्र या मंत्र्यांची अजून काही हिंमत होत नाही.
राज्यातील 105 हुतात्म्यांनी रक्ताचे पाणी करून हा महाराष्ट्र आणि मुंबई मिळवली. मात्र सध्याच्या सरकारला आपल्या महाराष्ट्राच्या जनतेची, सीमांची काळजी नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. हे सरकार षंढासारखे आणि नामर्दासारखे बसून आहे, हे नामर्द सरकार आहे, अशा जबरदस्त शब्दांत राऊतांनी सीमाप्रश्नी बोटचेपी भूमिका घेणारे शिंदे-फडणवीस सरकार अन निष्क्रिय मंत्र्यांचे कान उपटले होते. सरकार ढिम्म असताना विरोधी पक्षावर सर्वाधिक जबाबदारी आहे. सध्याच्या सरकारने दिल्लीतल्या दारातले पायपुसणे अशी महाराष्ट्राची स्थिती करून ठेवल्याची खंतही राऊत यांनी व्यक्त केली होती. हे बोल आता भाजपाच्या व शिंदे गटाच्या जिव्हारी लागले आहेत. ते पेटून उठले आहेत; पण कर्नाटकविरोधात नव्हे तर राऊत यांच्याविरोधात!
सीमाप्रश्नी सुरू असलेले रणकंदन अन अपडेट्स जाणून घेऊ ..
दिल्ली : संसदेच्या आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर शिवसेना खासदारांचे धरणे आंदोलन, प्रदर्शन; सीमा वादावर कर्नाटक सरकारचा निषेध, राज्यपाल हटावची मागणी
शंभुराज देसाई : न्यायालयाचे संरक्षण असताना खटल्यासाठी कर्नाटकात जाण्याची हिंमत करू न शकणारे संजय राऊत हेच मोठे षंढ आहेत. त्यांनी आपले तोंड आवरावे आणि उगाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करू नयेत. साडेतीन महिने तुरुंगात आराम करून बाहेर आल्यानंतर त्यांना बाहेरचे वातावरण मानवत नसेल. अशीच वक्तव्ये करणे टाळा नाहीतर पुन्हा तिकडे आराम करण्याची वेळ येऊ नये.
चंद्रशेखर बावनकुळे : संजय राऊत यांची भाषा शोभणारी नाही. बेळगावात आमचे मंत्री गेले नाही म्हणून सरकार षंढ आणि नामर्द आहे, असे म्हणणे, ही कुठली भाषा? शिंदे-फडणवीस यांच्यात मर्दानगी आहे, सरकार चालवण्याची धमकआहे. सामाजिक वातावरण गढूळ व अशांत करून मार्ग निघत नाही. अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार असताना मर्दानगी कुठे गेली होती? आमदारांना रेडा म्हणायचे, सरकारला षंढ, नामर्द म्हणायचे याला काय म्हणावे. तुरुंगात राहिल्याने संजय राऊत अशी भाषा आता बोलत आहेत. इतर कैद्याकडून कदाचित ते ही भाषा शिकले असावेत. त्यांना महाराष्ट्राची संस्कृती शिकविण्याची गरज आहे. रोज सकाळी असलं काही-बाही बोलणं हेच सध्या राऊत यांचे काम आहे.
संजय राऊत : तुमचे सरकार गेले खड्ड्यात! महाराष्ट्राला वेगळी पावले उचलावी लागतील.
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता. तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढपणा आहे.
दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाहीं.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे. ऊठ मराठ्या ऊठ!
धनंजय महाडिक : गेल्या अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नी वाद सुरु आहे. त्यात काल महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली गेली, हे निषेधार्ह आहे. कोल्हापूरपासून दहा किलोमीटरवर कर्नाटकची हद्द सुरु होते. वाद न्यायालयात प्रलंबित असताना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना रस्त्यांवर अशी गुंडगिरी, दादागिरी करणे शोभणारे नाही. मग आम्ही आमचाही हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र शांत बसणार नाही. कर्नाटकात आमच्या वाहनांवर हल्ले केले तर तुम्हाला कुठेही जाताना महाराष्ट्रातूनच जावे लागते, हे लक्षात ठेवा.
देवेंद्र फडणवीस : सीमाप्रश्नांचा दावा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. संविधानाने देशात प्रत्येकाला कुठेही राहण्याचा, जाण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे. कोणालाही एखादे राज्य त्यापासून रोखू शकत नाही. कर्नाटक राज्य सरकार संविधान पाळत नसेल, तर केंद्राकडे आम्ही तक्रार करू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आम्ही भेटणार आहोत. त्यांच्याशी या विषयावर चर्चा करू.
हे सुद्धा वाचा :
VIDEO : संसदेत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील खासदार आक्रमक
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडावर आवर घालावा : राज ठाकरे
दिल्लीत भाजपची 15 वर्षांची सत्ता कोसळली; आम आदमी पक्षाला मतदारांचा कौल
सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…
दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत (wealth)…
४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…