टीम लय भारी
मुंबई : मुंबईत सामान्यांसाठी लोकल (Local trains) आणि शाळा सुरु (reopen schools) करण्याचे संकेत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत. थंडी आणि दिवाळीच्या तिस-या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे हे रुग्ण न वाढल्यास मुंबईत १५ डिसेंबरपासून सामान्यांसाठी लोकल, शाळा सुरु करता येईल का याबाबत आढावा घेतला जात असल्याचे चहल यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले की, सध्या दररोजची रुग्णसंख्या ९०० ते १००० पर्यंत असून, विविध रुग्णालयांत सुमारे ९ हजार ६०० रुग्ण उपचार घेत आहेत. दिवाळीनंतर रुग्णवाढीचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना वाढवल्या. त्यामुळे संसर्गाचा वेग रोखता आला आहे.
नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून सुरक्षित अंतर, मास्क लावावा. आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नये. ही काळजी घेतली नाही, तर संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन टाळणे हे पूर्णपणे आपल्या हाती आहे, असे ते म्हणाले.