राज्यातील टोलनाक्यांवरून राज ठाकरे यांनी गुरुवारी, (12 ऑक्टोबर) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर, आज शुक्रवारी (13 ऑक्टोबर) पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत टोलच्या मुद्द्यावरून सुमारे 2 तास चर्चा करण्यात आली. काल मुख्यमंत्ऱ्यांसोबत झालेल्या बैठकीतून विशेष तोडगा न निघाल्याने आज पुन्हा एकदा बैठक घेण्यात आली. आज झालेल्या बैठकीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दादा भुसे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आहे. या बैठकीतून टोलसंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले, “9 वर्षानंतर ठाण्यातून टोलचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. टोलच्या मुद्यासाठी काल सह्याद्रीवर गेलो होतो. राज्यात कोणत्याच टोलवर चारचाकींना टोल आकारात नसल्याच फडणविसांनी सांगितले होते. त्यांच्या व्यक्तव्यानंतर राज्यात चलबिचल सुरू झाली.”
राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे
- पुढील 15 दिवसांत मुंबईच्या सर्व एंट्री पॉईंटवर राज्य सरकार तसेच मनसेतर्फे कॅमेरे लावण्यात येणार
- या कॅमेऱ्यावर मंत्रालयातून वॉच ठेवला जाणार
- टोलनाक्यांच्या एंट्री पॉइंटवर गाड्यांची मोजणी करण्यात येईल.
- नागरिकांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन नंबर देण्यात येणार
- मनसेतर्फे राज्यातील सर्व टोलनाक्यांवर स्वच्छतागृहांची उभारणी
- मंत्रालयात टोलसंदर्भात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार
- करारातील सर्व उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे आयआयटीकडून ऑडिट करण्यात येईल
- यलो लाईनच्या 200 मीटर अंतरावरील सर्व वाहने विनाटोल सोडली जाणार.
- 4 मिनिटांच्या पुढे एकही गाडी टोलनाक्यावर थांबणार नाही
- टोलनाक्यावर आता पोलीस तैनात केले जातील
- डिजिटल बोर्ड लावून टोलवसुलीची माहिती दिली जाईल
- ठाण्यातील आनंदनगर किंवा ऐरोली टोलनाक्यावर एकदाच टोल भरला जाईल
- फास्ट टॅग चालला नाही तरी टोल भरावा लागणार नाही
- चारचाकी वाहनांवरील टोल दरवाढ रद्द करण्यासाठी सरकारला 1 महिन्याचा अवधी
- पीडब्ल्यूडीचे 29 तर MSRDC चे 15 टोलनाके बंद करण्याबाबत 15 दिवसांत निर्णय
- टोलनाक्याजवळ राहणाऱ्या रहिवाशांना सवलत पास
- राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते खराब असतील तर टोल रद्द करू शकतो.
- अवजड वाहनांना महिनाभरात शिस्त लावणार
राज्यातील टोल नाके आणि त्यासंबंधातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, आमदार राजू पाटील, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलिस गृहनिर्माण मंडळाच्या अर्चना त्यागी, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, यांच्यासह मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
टोलप्रश्नी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मा. श्री. एकनाथराव शिंदे यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. ह्या भेटीत संपूर्ण पथकर धोरणातील तरतुदी, जमा झालेल्या पथकरातील पारदर्शकता, पथकाराच्या मोबदल्यात जनतेला मिळणाऱ्या सुविधा, पथकराची कालमर्यादा, पथकर महसूलातील केंद्र… pic.twitter.com/p3bD9krptI
— Raj Thackeray (@RajThackeray) October 12, 2023
यावेळी राज्यातील टोल प्रश्न, टोल नाक्यांची कंत्राटे यासोबतच मुंबई पोलिसांच्या घराबाबतच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी, पोलिसांना 15,000 घरे देण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली.