लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : सत्ता स्थापनेवरून शिवसेना व भाजपमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. त्यासाठी संजय राऊत यांना जबाबदार धरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद जोरदार टीका केली. ही पत्रकार परिषद खासदार शरद पवार आणि संजय राऊत यांनी पवार यांच्या निवासस्थानी दूरचित्रवाणीवर एकत्र पाहिली. राऊत यांनीच पत्रकारांना ही माहिती दिली.
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळजीवाहू म्हणून काम करणार हेच काळजीचे कारण आहे. मी नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवर टीका केलेली. मोदी व शाह यांना आम्ही आदरास्थानी मानतो. फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात उद्धव ठाकरेच काय ते बोलतील. अडिच वर्षे मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय झालेला नाही असे फडणवीस म्हणत आहेत. पण उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये ही चर्चा झाली होती. फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, भाजपाचा इतिहास पाहावा लागेल. ज्या पक्षांनी मोदींवर टीका केली. वैचारिक मतभेद आहेत. त्यांच्याही मांडीला मांडी लावून भाजपने सरकार स्थापन केले आहे. राम मंदिर ते कलम 370 ला विरोध करणाऱ्या पक्षांबरोबरही भाजपने जुळवून घेतले आहे.
मुख्यमंत्री म्हणत असतील, भाजपचे सरकार येईल, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. शिवसेनेने ठरवलं तर आमचे सरकार बनवू शकतो, आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीही होऊ शकतो, याचाही पुनरूच्चार खासदार राऊत यांनी केला.