टीम लय भारी
मुंबई : सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन देऊन केली होती. मात्र राज्यपालांनी याबाबत राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आज राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार यांनी स्वत: राज ठाकरेंचा फोन आला असल्याची माहिती दिली आहे. मला राज ठाकरे यांचा फोन आला. यावेळी राज्यपाल भेटीबाबत राज ठाकरेंनी चर्चा केली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तसेच राज ठाकरेंसोबत भेटण्याबाबत अजून काही ठरलं नसल्याचंही शरद पवारांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी, पूर्वी दोन हजार रुपये बिल यायचं, त्यांना १० हजार बिल आलंय आणि ज्यांना ५ हजार रुपये बिल यायचं त्यांना २५ हजार आलंय. लोकांकडे रोजगार नाहीत. हाताला काम नाही. घरी पैसे येत नाहीत. अशावेळी ते बिल कसे भरणार, असा सवाल उपस्थित करत सरकारनं लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा, अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. मात्र राज्यपालांनी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला देण्यात आल्याचे राज ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.