महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी कोश्यारी यांना शुभेच्छापत्र लिहीले असून या पत्रातून दानवे यांनी कोश्यारी यांना शिवसेनेच्या खास शैलीत फटकारले आहे. 20 जून रोजी 20 जून रोजी शिवसेनेच्या 40 आमदारांनी गद्दारी केली, त्यामुळे दिल्लीच्या पातशहांमार्फत हा दिवस जागतिक गद्दारी दिन म्हणून साजरा करण्यासाठी युनो कडे प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
सन 2019 मध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करत राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर हे सरकार अडीच वर्षात पडले. शिवसेनेचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात 40 आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्तांतर घडविले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मात्र शिवसेना ठाकरे गटाने बंडखोर आमदारांना गद्दार म्हणत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. कोश्यारी यांनी ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला वारंवार त्रास दिला. राज्यात गद्दारीचे पिक फोफावण्यासाठी कोश्यारी यांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रातून कडवट टीका केली आहे.
दानवे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण महाराष्ट्रात असताना ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारला वारंवार जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम अविरत चालू ठेवले होतेच! ते कमी झाले की काय म्हणून महाराष्ट्रात आपल्या दिल्लीच्या पातशहाच्या मार्गदर्शनाखाली सूर्याजी पिसाळ – खंडूजी खोपडे यांच्या गद्दारीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात गद्दारीचे पीक फोफवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.
याची परिणती २० जून २०२२ रोजी शिवसेना पक्षातून ४० आमदारांनी गद्दारी करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे पाप केले. असे म्हणतात ही गद्दारी जाणून घेण्यासाठी जगातील ३२-३३ देशांनी माहिती घेतली. जर अशा गद्दारीची जगातील एवढ्या देशातील जनतेचे लक्ष वेधले जात असेल तर हा दिवस “जागतिक गद्दार दिन” साजरा होवू शकतो, तो व्हावा म्हणून आपण आपल्या दिल्लीच्या पातशहांमार्फत “युनो” कडे प्रयत्न करावे, अशी मी आपणास विनंती करतो.
हे सुद्धा वाचा
‘आदिपुरुष’चे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांची मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी
संत निवृत्तीनाथांची पालखी कर्जत शहरात करणार मुक्काम तर मुक्ताबाईंची पालखी आज पारगाव मध्ये विसाव्याला
येत्या ३ ते ४ दिवसांत मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता
दानवे यांनी माजी राज्यपालांना लिहिलेल्या कडवट पत्रामध्ये त्यांनी दिल्लीच्या नेतृत्वावर देखील टीका केली आहे. दिल्लीतील नेतृत्वाच्या इशाऱ्यावरुनच राज्यपालांनी महाराष्ट्रात ठाकरे सरकार विरोधात मेहनत घेतल्याकडे त्यांचा रोख आहे. कोश्यारी यांच्यामुळे शिवसेनेच्या 40 आमदारांनी शिवसेना फोडण्याचे पाप केल्याचे त्यांनी म्हटले आहे.