टीम लय भारी
मुंबई : विधानपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला खूप मोठे यश मिळाले आहे. यानिमित्ताने राज्यातील मतदारांनी भाजप – आरएसएसला धडा शिकविला असल्याचा टोला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी मित्रपक्षांचे अभिनंदन केले असून मतदारांचे आभार मानले आहेत.
थोरात पुढे म्हणाले की, नागपूरचा जो मतदारसंघ गेली ५५ वर्ष कधीही काँग्रेसला मिळाला नव्हता, जो भाजप – संघाचा बालेकिल्ला समजला जात होता. त्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाला. मित्रपक्षांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचंड मेहनतीमुळेच हा आणि इतर विजय आम्ही संपादित कर शकलो, असे ते म्हणाले.
पुढील काळातही महाविकास आघाडी यश मिळवत राहील. कारण या निकालातून खूप मोठे आशीर्वाद जनतेने आम्हाला दिल्याचे मी मानतो. शेतकरी, कामगार हे तर पूर्णपणे भाजपच्या विरोधात गेले आहेत. दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनातून भाजप सरकार विरुद्धचा शेतकरी, कामगारांचा असंतोष बाहेर पडतो आहे, असेही त्यांनी सांगितले.
आता सुशिक्षित मतदारही आमच्या मागे ठामपणे उभा राहिलाय. याचा अर्थ असा की भाजपची विचारसरणी आणि कार्यपद्धती त्यांनीही पूर्णपणे नाकारली आहे. काँग्रेसच्या विचाराने हा देश पुन्हा आपल्याला बळकट बनवायचा आहे आणि विधानपरिषदेचा हा निकाल ही त्याचीच सुरवात आहे, असे ते म्हणाले.