लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : सकाळी कामावर जायला निघालेल्या मुंबईकर चाकरमान्यांची चिंता मध्य रेल्वेने वाढविली आहे. माटुंगा येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. अशातच अवकाळी पावसानेही मुंबईत जोरदार आगमन केले आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे दुहेरी हाल होत आहेत.
सकाळी कामावर जाणाऱ्यांची मोठी संख्या असते. त्यामुळे सकाळच्या वेळेत अप मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये तुडुंब गर्दी होत असते. दोन – तीन मिनिटे जरी उपनगरीय रेल्वे गाड्यांना उशीर झाला तरी गर्दीमध्ये मोठी भर पडते. अशातच आता वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने गाड्या धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल सुरू झाले आहेत.
दरम्यान, सिग्नल यंत्रणेतील दुरूस्ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे यथावकाश रेल्वे गाड्या वेळेत धावू लागतील, असे स्पष्टीकरण मध्य रेल्वेने दिले आहे.