टीम लय भारी
मुंबई : कोणाचेही नाव न घेता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळून लावला, अशी शेखी मुख्यमंत्र्यांनी मिरवणे म्हणजे शिखंडीच्या मागे लपून टीका करण्यासारखे आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा ‘वाफा फ्रॉम होम’… फुकटच्या टीमक्या.. अशा शब्दांमध्ये भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उत्तर दिले आहे. कोणाचेही नाव न घेता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळून लावला, अशी शेखी मुख्यमंत्र्यांनी मिरवणे म्हणजे शिखंडीच्या मागे लपून टीका करण्यासारखे आहे. त्यांनी सरळ सरळ महाराष्ट्रद्वेष्टे कोण आहेत? त्यांची नावे घेतली असती, तर थोडे अधिक बरे झाले असते. परंतु कायद्याचा गैरवापर करून लोकांना आपण तुरूंगात टाकतो आहे. त्यांना मारहाण करतोय हे न ओळखण्या इतकी महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही, अशी खरमरीत टीका भातखळकर यांनी केली आहे.
तसेच आरे कॉलनीतील कारशेडचा निर्णय योग्य वेळेला जनतेला सांगू, मग योग्य वेळ कधी येणार? तुमच्याच सरकारने नेमलेल्या सवलत समितीने आरेमध्येच कारशेड करा हे सांगितले, यावर तुमचे उत्तर काय? या समितीचा रिपोर्ट तुम्ही जनतेसाठी खुला का करत नाहीत? मंदिरं कधी उघडणार? एसटी कर्मचा-यांचा पगार कधी देणार? शेतक-यांना मदत कधी पोहचणार? या लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांची उत्तर न देता, त्यांचे लक्ष अन्य गोष्टींकडे वळवण्याकरता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळला, असा बागुलबुवा मुख्यमंत्री निर्माण करत आहेत, असा आरोप देखील भातखळकर यांनी केला आहे.