भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे दिसून येते आहे. उत्तर प्रदेशमधील लखिमपूर खिरी जिल्हयामध्ये दोन दलित बहिणींच्या (Dalit Sisters) बलात्कार (Rape) आणि हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरूवारी सहा आरोपींना अटक केली. उत्तर प्रदेशमधील लखिमपूर खिरी जिल्हयामध्ये दोन दलित किशोरवयीन मुलींचा मृतदेह संशयास्पद रीतीने झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. या घटनेनंतर स्थानिक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून (Police Authorities) मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडीत मुलींवर बलात्कार केल्यानंतर त्यांची हत्या केल्याची कबूली दिली आहे. या अक्षम्य गुन्हयाचे सहा आरोपींची नावे छोटू, जुनैद, सोहेल, हफीझुल, करीमुद्दीन आणि आरिफ अशी आहेत. कथित आरोपींबाबत माहिती देताना लखिमपूर खेरीचे पोलिस अधीक्षक संजीव सुमन यांनी सांगितले की, या सहा आरोपींपैकी एक जुनैद याला पोलिस चकमकी दरम्यान पायाला गोळी लागल्यामुळे तो जखमी झाला आहे.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, पीडीत मुलींना सोहेल आणि जुनैद यांनी काही प्रलोभन दाखवून जवळच्या शेतात नेले आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. जेव्हा त्या दोन बहिणींनी त्या आरोपींपुढे लग्न करण्याची मागणी केली तेव्हा सोहेल, जुनैद आणि हफीझुल यांनी त्यांची गळा दाबून हत्या केली. त्यांनतर या तिन्ही आरोपींनी करीममुद्दीन आणि आरीफला बोलावून झालेल्या घटनेचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्या मुलींचे मृतदेह झाडावर टांगले.
पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर असे स्पष्ट केले की, पीडीत मुलींचे मृतदेह बुधवारी त्यांच्या घरापासून 500 मीटर लांबीच्या अंतरावर उसाच्या शेतात एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत मिळाला. सहा आरोपींपैकी छोटू नामक आरोपी हा त्या मुलींच्या घराच्या शेजारी राहत होता. आणि त्यानेच त्या पीडीत मुलींची ओळख उर्वरित आरोपींशी करून दिली होती. त्यांनी स्पष्ट केले की, त्या पीडीत मुलींच्या शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांना पुढील तपास करण्यात सुस्पष्टता येईल.
हया दुर्दैवी घटनेनंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी त्या मुलींच्या हत्येबाबत हळहळ व्यक्त केली आणि उत्तर प्रदेशामध्ये भाजपप्रणित सरकारच्या कार्यकाळात स्त्रीयांविरूद्ध वाढलेल्या गुन्हेगारी घटनांबाबत हल्लाबोल केला आणि हया घटनेची तुलना त्यांनी हथरस येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेशी केली.
हे सुद्धा वाचा –
Mumbai Toilet Story : मुंबई महापालिका घडवते शौचालय सम्राट!
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या झोपेवर अजित पवारांचा सवाल !
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी झालेल्या प्रकाराबद्दल सरकारची बाजू स्पष्ट करताना सांगितले की, शासनाने आरोपींवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून येणऱ्या पिढया सुद्धा अशाप्रकारचे गंभीर गुन्हे करण्याचा विचारदेखील करणार नाही. पीडीत मुलींच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी सदर गुन्हयाचा खटला जलद गती न्यायालयात चालणार आहे.
उत्तर प्रदेश मध्ये अशा प्रकारची अमानवीय घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2020 साली सप्टेंबर महिन्यामध्ये हथरस या जिल्हयात 19 वर्षीय दलित मुलीची उच्चवर्णीय आरोपींनी बलात्कार करून हत्या केली होती. त्या मुलीचा मृत्यु 29 सप्टेंबर रोजी दिल्लीतील सफदरजंग रूग्णालयात झाला.
या घटनेनंतर पीडीत मुलीच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले की पोलिसांनी जबरदस्ती करून त्यांच्या मुलीचा मृतदेहावर मध्यरात्री अंतिम संस्कार करण्याचा दबाव टाकला. परंतु स्थानिक पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मुलीच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार पीडीत मुलीवर अंतिम संस्कार करण्यात आला होता.