टीम लय भारी
मुंबई : विधानपरिषदेच्या रखडलेल्या १२ जागांवर नियुक्ती करण्यासाठी राज्य सरकारने उमेदवारांची नावे बंद लिफाफ्यात आज राज्यपालांना सादर केली आहेत ( Mahavikas Aghadi government submitted names for Vidhanparishad’s 12 seats ).
या बंद लिफाफ्यातील १२ नावांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वतंत्र शिफारस पत्रही जोडण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रात १२ जागांच्या नियुक्तीबाबत कायदेशीर बाबींचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली ( Uddhav Thackeray submitted letter to Governor ).
अनिल परब, नवाब मलिक व अमित देशमुख या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना पत्र सादर केले आहे. राज्यपाल लवकरात लवकर या नावांना मंजुरी देतील, अशी आशा अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हे सुद्धा वाचा
विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक, १ डिसेंबरला होणार मतदान
शाळांसाठी दिवाळीची सुटी आता १४ दिवस, शिक्षण मंत्र्यांचा नवा निर्णय
मोदी सरकार मुद्दाम मुंबईतील रेल्वे सुरू करीत नाही : विजय वडेट्टीवार
गेल्या आठवड्यात मंत्रीमंडळाने १२ जागांच्या नियुक्तीचा ठराव मंजूर केला होता. त्याबाबतचा इतिवृत्तांत गुरूवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुर करण्यात आला. त्यानंतर ही १२ नावे आता राज्यपालांकडे दिली असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
या १२ जणांना संधी
‘महाविकास आघाडी’ सरकारकडून दिलेल्या १२ नावांबाबत कमालीची गुप्तता ठेवण्यात आली आहे. अधिकृतपणे अद्याप ही नावे कोणत्याच राजकीय पक्षांनी जाहीर केलेली नाहीत. तरीही ही नावे समोर आली आहेत. तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी चार नावांचा या बंद लिफाफ्यात समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस – एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे, प्रा. यशपाल भिंगे
काँग्रेस – रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरूद्ध वनकर
शिवसेना – उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे पाटील, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंदकर