लय भारी न्यूज नेटवर्क
सातारा : माझ्यावर मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कार्यकर्त्यांनी निराश न होता आपल्या स्वप्नातील माण-खटाव घडविण्यासाठी अधिक जोमाने कामाला लागावे, मी तुमच्या सोबत आहे असे आवाहन प्रभाकर देशमुख यांनी केले आहे.
अटीतटीच्या लढतीत अवघ्या 2500 मतांनी पराभूत झाल्यानंतर आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आमदार जयकुमार गोेरे यांचे नाव न घेता सडकून टीका केली.
प्रभाकर देशमुख म्हणाले की, माण-खटाव मतदारसंघातील मतदारांनी प्रचंड प्रेम करुन विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व मतदारांचा आभारी आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने लोकांनी हातात घेतली होती. सर्वसामान्य माणसं निवडणुकीत उतरली होती. लोकांनी प्रचंड कष्ट घेतले व प्रयत्न केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रस्थापितांच्या विरुद्ध मतदान झाले. गेल्या अनेक वर्षात या मतदारसंघात जे गुन्हेगारीकरण व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या प्रवृत्तीविरुद्ध आम्ही निकराचा लढा दिला. आकडेवारीमध्ये काही मतांनी कमी पडलो असलो तरी लोकांनी दिलेला कौल आम्ही मान्य केला आहे. यापुढे अधिक जोमाने लोकांच्यात जाऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु.
श्री. देशमुख पुढे म्हणाले, दहा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व केल्यानंतरही निकालानंतर त्यांनी केलेला उन्माद व हावभाव दुर्दैवी आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे “चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत. त्यांनी केलेल्या एक्कावन हजार मतांच्या आघाडीच्या वल्गना जनतेने फोल ठरवल्या आहेत. मतदारांनी तुम्हाला जमिनीवर आणले आहे याची जाणीव ठेवावी.
श्री. देशमुख पुढे म्हणाले की, देशाचे नेते कै. यशवंतराव चव्हाण साहेबांनी विचारांचे राजकारण केले. तो वारसा माजी आमदार कै. सदाशिवराव पोळ तात्या, कै. केशवराव पाटील, कै. भाऊसाहेब गुदगे, कै. चंद्रहार पाटील, कै. बुवासाहेब माने यांनी पुढे चालविला. तेच विचाराचे राजकारण करण्याचे आम्ही ठरविले आहे. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे विजयाबद्दल मी अभिनंदन करतो. आम्ही वैयक्तिक पातळीवर टीका आतापर्यंत टाळली आहे याचे भान ठेवावे.
माझ्यावर मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबध्द आहे. कार्यकर्त्यांनी निराश न होता आपल्या स्वप्नातील माण-खटाव घडविण्यासाठी अधिक जोमाने कामाला लागावे मी तुमच्या सोबत आहे असे प्रतिपादन प्रभाकर देशमुख यांनी केले.