टिम लय भारी
बिहार : बिहारमधील सध्याच्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर लोक नाराज आहेत, त्यामुळे पुढील वर्षी पुन्हा निवडणुका होऊ शकतात, त्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी दिले आहेत. बिहारमध्ये निवडणुका होऊन एक महिना देखील झाला नाही, अशातच यादव यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळातील सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभा निवडणूक निकालाची नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, माझे राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी मला पूर्ण अधिकार दिले आहेत. सक्रिय रहा, पुढील वर्षी पुन्हा निवडणूक होऊ शकतात. या निवडणुकीत सर्वांनी पूर्ण तयारीनिशी उतरावे, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पक्षात मोठे फेरबदल करण्याचेही संकेत दिले. पक्ष सर्वच समूहातील लोकांना संधी देईल. आपले अनेक उमेदवार पक्षातूनच झालेल्या बंडखोरीमुळे पराभूत झाले आहेत, असे करूनही कुणालाही फायदा होत नाही. ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांना पक्ष दुसरीकडे संधी देईल, पण पक्षात राहूल पक्षविरोधी काम करणे चांगले नसल्याचे यादव म्हणाले.