लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी ‘महाविकासआघाडी’चे सरकार स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. भाजपने आता शिवसेनेला पहिल्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दाखविली आहे. तसा प्रस्तावच भाजपने शिवसेनेला पाठविला असल्याची बातमी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केली आहे.
सरकार स्थापन करण्यावरून गेले जवळपास 25 दिवस रवंथ सुरू आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर आपला दावा केला होता, तर शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू केली. शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनीही मंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिवसेनेची काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत धिम्या गतीने बोलणी सुरू होती. एका मागाहून एक सुरू असलेले बैठकांचे सत्र संपत नव्हते. या काळातच भाजपने शिवसेनेला जवळ करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. परंतु भाजपने मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका घेतली. दोन्ही पक्षांमध्ये तुटेपर्यंत ताणले गेले.
अशातच काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा अंतिम निर्णय गुरूवारी जाहीर केला. येत्या दोनेक दिवसांत सरकार स्थापन होणार असल्याचे आता चित्र आहे. अशातच कमालीच्या उशिराने भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दाखविली आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी हे पद देण्याबाबत भाजपच्या नवी दिल्लीतील एका नेत्याने मातोश्रीवर प्रस्ताव पाठविला आहे, असे ‘लोकसत्ता’च्या बातमीमध्ये म्हटले आहे.
भाजपचा प्रस्ताव शिवसेनेसाठी अयोग्य
भाजपने प्रस्ताव पाठविण्यास फार उशीर केला आहे. भाजप – शिवसेनेमधील फाटलेल्या संबंधांविषयी जनतेमध्येही नकारात्मक संदेश गेलेला आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आल्यास जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सरकारबाबतचे ठरलेले सूत्र तिन्ही पक्षांना न्याय देणारे आहे. इतका न्याय्य वाटा देण्याचा भाजपचा स्वभाव नाही. सगळेच स्वतःकडे ओरबाडून घेण्याची भाजपला चटक लागली आहे. त्यामुळे भाजपने पाठविलेला प्रस्ताव केवळ लाल गाजर असू शकेल, अशी भावना भाजप विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, भाजपकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
हे सुद्धा वाचा
VIDEO : हेमामालिनींनी मांडली समस्या, माकडे फ्रुटी – सामोसे – पेढे खातात, अन् त्रासही देतात
VIDEO : खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ मागणी
औरंगाबादेत उध्दव ठाकरेंच्या विरोधात फसवणुकीची तक्रार
‘महाविकासआघाडी’चे नेते शुक्रवारी सत्तास्थापनेचा दावा करणार
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री; तर बाळासाहेब थोरात, अजित पवार उपमुख्यमंत्री