टीम लय भारी
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर पडळकर यांच्याविरूध्द राज्यात निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर शरद पवार यांनी पडळकरांचा आज चांगलाच समाचार घेतला. “ज्यांना विधानसभा, लोकसभेला लोकांनी बाजूला केले आहे, अशा लोकांची नोंद घ्यायची आवश्यकता नाही”, अशी उपहासात्मक टीका शरद पवार यांनी पडळकरांचे नाव न घेता केली आहे.
शरद पवार काय उत्तर देणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर, आज शरद पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी, पत्रकारांशी बोलताना यावर भाष्य केल्याचे दिसले. शरद पवार सातारा येथे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, ज्यांना विधानसभा, लोकसभेला लोकांनी बाजूला केले आहे, त्यांची अनामत जप्त झाली आहे. अशांना वेळोवेळी लोकांनी उत्तर दिले आहे. अशा लोकांची नोंद घ्यायची आवश्यकता नाही. साताऱ्यात ते रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं होतं.