टीम लय भारी
मुंबई : उद्योजक कपिल वाधवा ( Wadhwan ) यांच्या कुटुंबाला खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्याचे परवानगीचे पत्र दिल्या प्रकरणी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली. त्यानंतर गुप्ता यांच्याकडील कार्यभार वरिष्ठ सनदी अधिकारी श्रीकांत सिंह यांच्याकडे देण्यात आला आहे. शिवाय गुप्ता यांच्या या पत्राची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबतचा आदेश गृह विभागाने जारी केला आहे. लॉकडाऊन असतानाही गुप्ता यांनी वाधवा ( Wadhwan ) कुटुंबियांना हे पत्र कसे दिले याची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात येत आहे. गुप्ता यांनी दिलेल्या पत्रासंबंधीची चौकशी करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करावा असे या आदेशात म्हटले आहे.
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. असे असतानाही अमिताभ गुप्ता यांनी स्वतःच्या लेटरहेडवर कपिल वाधवा ( Wadhwan ) व इतरांना खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करण्याचे शिफारस पत्र दिले. त्यात वाहनांसह वाधवा यांना प्रवास करू देण्यास सहकार्य करण्याचे नमूद केले आहे. त्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. गुप्ता यांच्याकडील कार्यभार अपर मुख्य सचिव श्रीकांत सिंह यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचेही या आदेशात म्हटले आहे.
अमिताभ गुप्तांना बडतर्फ करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केंद्राकडे करावी : अनिल देशमुख
अमिताभ गुप्ता हे सनदी अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांनी गुप्ता यांना बडतर्फ करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करावी असा टोला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हाणला आहे.
हे सुद्धा वाचा
Mahatma Phule : अजितदादांचे आवाहन, ‘कोरोना’च्या संकटात घरातच महात्मा फुलेंच्या विचारांचे स्मरण करा
Wadhawan : शरद पवार, अनिल देशमुखांवर भाजपचा निशाणा