लय भारी न्यूज नेटवर्क
तुळजापूर : सत्ताधारी भाजपकडून राज्य सरकारच्या तिजोरीची लूट सुरू आहे. त्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. शिवाय राज्य सरकारने जे कर्ज काढले आहे, त्यासाठी वर्षाला 64 हजार कोटी रुपये आपण व्याजापोटी भरतो. त्यातले दहा हजार कोटी वाचवता आले तर आम्ही 7 लाख पोलिसांची नवीन भरती करून त्यांना पगारा पोटी हे दहा हजार रुपये देऊ. मात्र हे सरकार असे करीत नाही. हे सरकार संघटित डाकू, तर काँग्रेस भुरटे चोर असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्या प्रचार सभेवेळी ते बोलत होते.
राज्यात पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. योग्य नियोजनाअभावी राज्यात दुष्काळ पडतो. सत्तेवर आल्यावर या पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना योग्य पाणीपुरवठा करू. तसेच पोलिसांचे कामाचे आठ तास करण्यासाठी राज्यात 7 लाख पोलीस भरती करू.
– अॅड. प्रकाश आंबेडकर
संसदेत ट्रिपल तलाक विधेयक आले, त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी त्याच्या बाजूने मतदान केले. अशा लोकांना मतदान करणे हे हराम आहे. मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वात जास्त उमेदवारी वंचितने दिली आहे. आम्ही चांगल्या कामाला विरोध करीत नाही. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे होते त्यावेळी त्यांना आरक्षण द्या म्हणून मी आरक्षणाच्या बाजूने उभा राहिलो असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
लोकांच्या प्रश्नासाठी गेली अनेक वर्षे आंदोलने केली. मात्र सरकारवर त्याचा काही परिणाम झाला नाही. या सरकारच्या पेनाची शाई सुकली असून आता आपल्याला आपला पेन तयार करायचा आहे. शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न आम्ही सोडवू. मावळच्या 5 धरणाचे पाणी आम्ही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला देऊ. आम्हाला सत्ता दिली तर एकही वंचित राहणार नसल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा विधानसभेचा जाहीरनामा कॉपी पेस्ट आहे. वंचितचा लोकसभेचा जाहीरनामा काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतल्याचे ते म्हणाले. आमचे सरकार आल्यावर केजी ते पीजी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ. तशी ताकद वंचित बहुजन आघाडीमध्ये असून आत्ताच्या सत्ताधारी पक्षात निर्णय घेण्याची ताकद नसल्याचेही ते म्हणाले.
तुम्हाला तुमच्या बँकेतील पैसा सुरक्षित ठेवायचा असेल तर वंचितच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करून निवडून द्या. असे ही शेवटी म्हणाले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
[box type=”shadow” align=”” class=”” width=””]’नो पेड न्यूज’ : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्या हिताच्या बातम्या छापून याव्यात म्हणून अनेक उमेदवार प्रसारमाध्यमांना लालूच दाखवतात. त्या पार्श्वभूमीवर ‘लय भारी’ या न्यूज पोर्टलने ‘नो पेड न्यूज’ ही सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ‘लय भारी’ पोर्टलसाठी कुणीही लालूच दाखविण्याचा प्रयत्न करू नये. वस्तुनिष्ठ, सत्य व भारतीय राज्य घटनेच्या तत्वांना अनुसरूनच आम्ही पत्रकारिता करतो, हे अभिमानाने नमूद करीत आहोत. – संपादक[/box]