टीम लय भारी
मुंबई :- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात राज्यात काही ठिकाणी आरोग्य सुविधा योग्य दिल्या जात नाहीत. राज्य सरकारचे आरोग्य व्यवस्थेवर लक्ष नसल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात घडलेला प्रकार हा ह्रदय हेलावणारा आहे. परंतु राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र यातून दिसून येत असून आरोग्य व्यवस्थाच ‘अत्यवस्थ’ झाली आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
घाटी रुग्णालयात पायाला जखम झालेली, जखमेला मुंग्या लागलेल्या, माश्या घोंगावत असल्याच्या अवस्थेत एक व्यक्ती घाटी रुग्णालयातील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होता, काहींनी अपघात विभागातील डॉक्टरांना ही माहिती दिली, पण दुर्देवाने रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही, हे चीड आणणारे आहे. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.
दरेकर म्हणाले की, रुग्णालयातील कुणीही उपचार करण्याकरीता धावले नाहीत, आणि शेवटी जागेवरच त्या व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला. आपल्या कर्तव्यात अक्षम्य कसूर करणारा आरोग्य विभाग आणि रुग्णालय प्रशासन या घटनेला कारणीभूत असुन हे राज्यसरकारचे पाप आहे. करोनासारखे संकट आज राज्यात घोंगावत आहे, आरोग्य व्यवस्थेवर राज्यसरकारने काटेकोरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, पण ते दिले जात नसल्याने अशा निष्पाप लोकांचा नाहक बळी जात आहे, असे ही दरेकर यांनी सांगितले.