लयभारी न्यूज नेटवर्क
अहमदनगर : भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा तोफ डागली. भाजपने मला भरभरून दिले आहे. त्यामुळे मी पक्षावर कधीच नाराज नव्हतो आणि नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि यांच्याभोवतीच्या चौकडीने आपल्याला त्रास दिला, असा आरोप खडसे यांनी केला.
खडसे यांनी आज शनिवार ( 11 जानेवारी ) रोजी शनिशिंगणापूर येथे सहकुटुंब दर्शन घेतले. चौथऱ्यावर जाऊन अभिषेकही केला. त्यानंतर प्रसारधमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.
खडसे म्हणाले, ‘भाजपसाठी आपले मोठे योगदान आहे. पक्षाने आपल्याला भरूभरून दिले आहे. त्यामुळे आपण पक्षावर नाराज होण्याचा प्रश्नच नाही. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांना मिळून बहुमत मिळाले. मात्र, सरकार स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्ष आपल्या भूमिकांवर अडून बसले. त्यामुळे सरकार स्थापन झाले नाही. फडणवीस आणि त्यांच्या भोवतीच्या चौकडीमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. आपल्याला यावर खूप काही बोलायचे आहे, वेळ आल्यावर सविस्तर बोलणार आहे. सध्या राज्यात सत्तेवर आलेले खिचडी सरकार फार काळ टिकणार नाही.’ असंही खडसे म्हणाले.