पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली तीस वर्षे कार्यरत असणारे ‘लय भारी’चे कार्यकारी संपादक सुधाकर काश्यप यांना यांना पत्रकारितेतील कामगिरीबद्दल तसेच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची समाधी शोधणारे सुहास राजेशिर्के यांना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले याच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले. नवी मुंबई येथील विष्णूदास भावे नाट्य मंदीरात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
समाजाच्या विविध क्षेत्रात झोकून देऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींची गौरव व्हावा आणि हा गौरव होत असताना त्यांच्या विधायक कार्यातून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी दरवर्षी महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा यथोचित गौरव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती नवी मुंबई यांच्या वतीने पार पाडला जातो. यावर्षी महाराष्ट्रातील उद्योजकांबरोबरच समाजात आदर्शवादी आणि ऐतिहासिक महत्व अधोरेखित करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘लय भारी’चे कार्यकारी संपादक सुधाकर काश्यप यांना देखील पत्रकारितेतील योगदानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना, सुहास राजेशिर्के म्हणाले, श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या कार्यात सातत्य ठेवत आलो याचाच हा खरेतर बहुमान आहे.
येसूबाई यांच्या समाधी स्थळाचा शोध घेतल्याबद्दल रामदास आठवले यांनी सुहास राजेशिर्के यांचे अभिनंदन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी सुहास राजेशिर्के यांच्या कार्यांचा गौरव केला. ते म्हणाले सुहास राजेशिर्के यांचा एकूणच प्रवास हा खाचखळग्यातून झाला आहे. त्यामुळे स्पंदन प्रकाशनाच्या वतीने त्यांचा जीवनप्रवास असणारे खाचगळगे हे पुस्तक आम्ही लवरच महाराष्ट्रातील वाचकांच्या हाती देणार आहोत. महापुरुषांच्या विचारप्रेरणेतून केलेले राजेशिर्के यांचे आजवरचे कार्य दखल घ्यावे असेच आहे. खरेतर, अशी कर्तृत्ववान माणसे महाराष्ट्राने जपली पाहिजेत, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.
हे सुद्धा वाचा
घरकाम करणाऱ्या महिलेनं भाडेकरूंना 3 कोटी रुपयांना फसवलं.
आखाजी गाणी : खान्देशातील अक्षय्य तृतीया खास करणारी अहिराणी गीते
यावेळी उद्योजक गणेश चव्हाण, प्रगत पडघन, लेणी अभ्यासक सूरज जगताप, राहूल रामगुडे, संजय भंडारे आदी मान्यवरांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. परिवर्तनवादी गीतांनी पुरस्कार सोहळ्यात रंगत आणली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समितीने विशेष परिश्रम घेतले. नवी मुंबईसह महाराष्ट्रातून अनेकांनी या पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती दर्शवली.