लोकसभा निवडणुक आता संपली असून लगेचच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सहा महत्त्वकांक्षी प्रकल्पांच्या ३७ टप्प्यांतील कामासाठी ६७ हजार कोटींच्या निविदा मंगळवारी खुल्या केल्या आहेत(
67 thousand crore tenders for projects in the state)
. यामध्ये नवयुग, मेघा, एल अँड टी, जे कुमार, अॅपको या बड्या कंपन्यांसह अन्य कंपन्यांच्याही निविदा आहेत.
यामध्ये‘एमएसआरडीसी’ने पुणे वर्तुळाकार रस्ता, विरार – अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, जालना – नांदेड द्रुतगती महामार्ग, भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्ग, नागपूर – गोंदिया द्रुतगती महामार्ग आणि नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्ग असे सहा प्रकल्प हाती घेतले आहेत.
या बांधकामासाठी काही महिन्यांपूर्वी ‘एमएसआरडीसी’ने निविदा मागवल्या होत्या. पुणे वर्तुळाकार रस्त्यासाठी नऊ टप्प्यांत, बहुउद्देशीय मार्गिकेसाठी ११ टप्प्यांत, तर जालना – नांदेड द्रुतगती महामार्गासाठी सहा टप्प्यांत निविदा मागवल्या होत्या. त्याच वेळी समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाचा भाग असलेल्या भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्गासाठी एका टप्प्यात, गोंदिया – नागपूर द्रुतगती महामार्गासाठी चार टप्प्यांत आणि नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्गासाठी सहा टप्प्यांत निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानुसार पुणे वर्तुळाकार रस्ता, बहुउद्देशीय मार्गिका आणि नांदेड – जालना या तीन प्रकल्पांसाठी २६ टप्प्यांत ८२ तांत्रिक निविदा दाखल झाल्या होत्या. तर भंडारा – गडचिरोली, गोंदिया – नागपूर आणि नागपूर – चंद्रपूर महामार्ग अशा समृद्धी विस्तारीकरणाच्या तीन प्रकल्पांसाठी ११ टप्प्यांत ४६ निविदा दाखल करण्यात आल्या होत्या.
तांत्रिक निविदा खुल्या केल्यानंतर मंगळवारी ‘एमएसआरडीसी’ने सहाही प्रकल्पांसाठीच्या निविदा खुल्या केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी मेघा इंजिनीयरिंगने तीन, नवयुगने तीन तर पीएनसी इन्फ्रा, रोड-वे सोल्यूशन्स इंडिया इन्फ्रा, तसेच जी.आर. इन्फ्राने प्रत्येकी एका टप्प्याच्या निविदेत बाजी मारली आहे. त्याचवेळी जालना – नांदेड द्रुतगती महामार्ग प्रकल्पासाठी अॅपको इन्फ्राने दोन, माँटेकार्लो ने दोन तर रोडवे सोल्यूशन्स इंडिया इन्फ्रा आणि पीएनसी कंपनीने प्रत्येकी एका टप्प्याच्या कामासाठीच्या निविदा मिळविल्या आहेत. तर समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणातील तीन महामार्गांसाठी जीआर इन्फ्रा, गवार कन्स्ट्रक्शन, बीएससीजीएल इन्फ्रास्ट्रक्चर आदी कंपन्यांनी बाजी मारली आहे. आता या ३७ टप्प्यांतील बांधकामांच्या निविदा अंतिम करून आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर संबंधित कंपन्यांना कंत्राटे दिली जातील. या वर्षातच या सहाही प्रकल्पांचे बांधकाम सुरू करण्याचे ‘एमएसआरडीसी’चे नियोजन आहे. हे सहाही प्रकल्प एकूण ६७ हजार कोटी रुपये खर्चाचे असल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले.