शिक्षणाची आवड सगळ्यांना असते पण काही रस्त्यावरील मुलांना आर्थिक अडचण असल्यामुळे शिकता येत नाही. रस्त्यावरील मुलांना शिकता यावं म्हणून ठाणे जिल्ह्यात फिरते पथक शाळेतील 145 मुला – मुलींना महापालिका व खासगी शाळेमध्ये प्रवेश मिळाला आहे. मुलांना शाळेचा गणवेश आणि साहित्य देण्यात आले. वितरणाचा कार्यक्रम आमदार निरंजन डावखरे व जिल्हाधिकारी अशोक शिगनारे यांच्या उपस्थितीत पार पडला. ठाणे जिल्ह्यात महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या फिरते पथक हा उपक्रम शाळेच्या मुलांसाठी करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये झालेल्या या आगळावेगळ्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री. डावखरे व जिल्हाधिकारी श्री. शिनगारे उपस्थित होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वर्षा दीक्षित, पोलीस निरीक्षक मनिष पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा राणी बैसाणे, भरत पोखरकर, स्वाती रणधिर, स्वयंसेवी संस्थाचे स्वाती सिंग, विजय जाधव, रमेश थोरात, श्री.खान आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना गणवेश, शालेय साहित्याचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले.
हे सुध्दा वाचा :
युपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या गुणवंतांचा युवा उत्थान फाऊंडेशन करणार गौरव
व्हॉट्सअॅपचे नवे फीचर – चॅनेल; काय आहे, कसे काम करते ते जाणून घ्या …
या कार्यक्रमामुळे देशाच्या भावी पिढीच्या नियोजनासाठी आल्याचा आनंद झाला आहे. उपेक्षित, रस्त्यावर राहणाऱ्या या मुलांना शिक्षणाच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाचा हा उपक्रम चांगला आहे, असे आमदार डावखरे म्हणाले.जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, शाळाबाह्य मुलांना औपचारिक शिक्षणात समावून घेण्याचा हा प्रयत्न म्हणजे सामाजिक ऋण फेडण्याची संधी आहे. या मुलांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास पाहता, ते पुढील आयुष्यात राष्ट्राला दिशा देणारे व्यक्तिमत्व होतील. उपक्रमासाठी आवश्यक ते विधी सहाय्य मिळेल, असे श्री.सुर्यवंशी यांनी सांगितले.