35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Khadse : भाजपात असताना खडसेंनी केले 'असे' उद्योग! स्वत:च दिली कबुली

Eknath Khadse : भाजपात असताना खडसेंनी केले ‘असे’ उद्योग! स्वत:च दिली कबुली

टीम लय भारी

जळगाव : भाजप आपले आमदार सांभाळण्यासाठी हे सरकार पडणार असल्याचे उद्योग करत आहे. मीही तिकडे भाजपत असताना असे उद्योग केले आहेत. आमदार सांभाळण्यासाठी तसे करावेच लागते, अशी कबुलीच माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली.

पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी खडसे बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, शरद पवार हे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिताच येणार नाही, अशा शब्दांत खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. भाजपला दूर ठेवत शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार आणण्याचा चमत्कार केला. अटलबिहारी वाजपेयी यांनी ३२ पक्षांचा ट्रक पाच वर्षे यशस्वीपणे चालवला. मग तीन पक्षांची महाविकास आघाडीची रिक्षा का चालणार नाही, असे सांगत महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, असा विश्वास देखील एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर अनेकांनी मला विचारणा केली की, तुम्ही राष्ट्रवादीचाच पर्याय का निवडला? भाजप मी सोडली नाही, तर मला भाजपने अक्षरशः बाहेर ढकलले. भाजपने मला पक्ष सोडायला भाग पाडले. अशा परिस्थितीत बहुजन समाजाला ख-याअर्थाने न्याय देणारे शरद पवारच आहेत. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मैलाचे दगड ठरतील, असे निर्णय घेतले. माझे पहिले मुख्यमंत्री म्हणून मी नव्वदीच्या दशकामध्ये त्यांच्यासोबत काम केले आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देण्याचे काम शरद पवारांनी केले. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून पवारांनी चांगले निर्णय घेतले. पवारांच्या उत्तम कामगिरीचे अनेक पैलू सांगता येतील, असेही खडसे यावेळी म्हणाले.

आज ना उद्या सरकार पडेल, असे भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. पण वर्ष झाले अजून तसे काहीही घडलेले नाही. सत्तेत येण्यासाठी भाजपला एका विशिष्ट पक्षाचे पूर्ण समर्थन हवे आहे. एखादा पक्ष तिकडे गेल्याशिवाय भाजपचे सरकार येऊच शकत नाही. उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री पदावर काम करतील का? नाही ना, मग शिवसेना तिकडे भाजपसोबत जाणारच नाही. काँग्रेस तर उभ्या हयातीत भाजपसोबत जाऊ शकत नाही. राष्ट्रवादीचा विषयच नाही. एकदा भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण काय झाले? याचा त्यांना चांगला अनुभव आहे, असा चिमटा खडसेंनी यावेळी सरकार कोसळण्याच्या मुद्द्यावर बोलताना भाजपला काढला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी