अनेकांचा लाडका कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीतबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राजू सध्या पुर्णपणे व्हेंटिलेटरवर असल्याने त्यांना अद्याप जाग आलेली नाही परंतु त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. राजू श्रीवास्तव सध्या दिल्लीच्या एम्समध्ये उपचार घेत असून अद्यापही ते बेशुद्ध असल्याचे राजू श्रीवास्तव यांचा लहान भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी सांगितले, त्यामुळे राजू लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना करण्यात येत आहे. राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले.
हाती आलेल्या माहितीनुसार, अभिनेता आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव जीममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते तिथेच कोसळले. राजू यांना त्यावेळी तात्काळ दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करून राजू यांना एक महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे, तरीही त्यांना अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले आहे. राजू व्हेंटिलेटरवर असले तरीही त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे राजू यांचा लहान भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी सदर माहिती दिली.
हे सुद्धा वाचा…
Raj Thackeray : ‘माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही कसली घाण’
Nandurbar News : तरुणीचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक गोष्टी उघड
याबाबत अधिक माहिती देताना दीपू श्रीवास्तव म्हणतात, राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचा वेग कमी आहे, मात्र तो लवकरच बरा होईल. त्याची प्रकृती स्थिर आहे. सध्या तो व्हेंटिलेटरवर असून राजू 35 दिवसांपासून इस्पितळात आहे. पुढे दिपू म्हणतात, त्याच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तो बरे होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे आता त्याला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज आहे असे म्हणून दीपू यांनी राजू यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्याची विनवणी केली आहे.
दरम्यान, राजू श्रीवास्तव यांची प्रकृतीबाबत विचार करता त्यांना उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. राजूंना मुंबईत घेऊन येण्याबाबत दिपू यांना विचारले तर ते म्हणाले, अशी कोणतीही योजना नाही, राजूवर एम्समध्येच उपचार केले जाणार आहेत. डॉक्टरांवर पूर्ण विश्वास असून राजू पूर्णपणे बरे झाल्यानंतरच त्यांना घरी नेण्यात येईल असे दिपू यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.