मोठ्या पदांवर काम करणाऱ्या लोकांना अनेकविध सवयी असतात. उद्योजक, अभिनेते, राजकीय नेते अशा सेलिब्रिटींच्या चांगल्या – वाईट सवयींविषयी जनमाणसांत उत्सुकता असते. राजकीय नेत्यांच्या सवयींबद्दल चांगले कमी बोलले जाते. पण वाईट मात्र अधिक बोलले जाते. राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना अशा काही सवयी आहेत, की त्या अनेकांना माहीत नाहीत (Girish Mahajan Has good Habits). या सवयींबद्दल ऐकून कुणालाही त्यांचे अनुकरण करावेसे वाटेल. जेवण, आरोग्य, सामाजिक उत्तरदायित्व यांविषयी गिरीश महाजन यांनी स्वतःचे काही मापदंड तयार केले आहेत. हे मापदंड ते स्वतः कटाक्षाने पाळतात.
गिरीश महाजन यांचा सर्वात चांगला व महत्वाचा गुण म्हणजे, त्यांना कोणतेही व्यसन नाही. महत्वाच्या बैठका व उंची लोकांसोबत सतत करावी लागणारी ऊठबस यांमुळे दारू, सिगारेट, गुटखा अशी व्यसने म्हणजे मोठ्या लोकांसाठी किरकोळ बाबी असतात. परंतु महाजन यांनी स्वतःला अशा व्यसनांपासून चार हात दूर ठेवले आहे.
गिरीश महाजन आपल्या आहाराविषयी सुद्धा दक्ष असतात. आरोग्यासाठी अपायकारक असलेले चमचमीत खाद्य सवयींना त्यांनी दूर ठेवले आहे. ते गोड पदार्थ खात नाहीत. इतकेच काय ते चहा देखील घेत नाहीत. तळलेले – तेलकट पदार्थ खात नाहीत. ग्रीन सलाड, उखडलेली मटकी – मुग ते खातात. पालेभाज्या, डाळींचा वापर जेवणात जास्त करतात.
हे सुद्धा वाचा
गिरीश महाजन : एक धडाडीचे तडफदार नेतृत्व
गिरीश महाजनांची मोहीम, आरोग्यविषयक उपक्रम मोठ्या संख्येने राबविणार !
गिरीश महाजनांनी तृतीयपंथियांसाठी उचलले मोठे पाऊल
गिरीश महाजन पहाटे ३ वाजता पोचले
कितीही व्यस्त असले तरी ते व्यायाम टाळत नाहीत. त्यांनी घरीच व्यायामशाळा बनविलेली आहे. त्यांच्या सेवासदन या सरकारी निवासस्थानी सुद्धा त्यांनी एक छोटेखानी जीम उभी केली आहे. तिथे ते व्यायाम करतात.

राजकारणात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला इच्छा असो अथवा नसो पण सामाजिक बांधिलकी जपावीच लागते. बऱ्याच नेत्यांमधील सामाजिक बांधिलकीचा नाटकीपणा लोकांच्याही लक्षात येत असतो. परंतु गिरीश महाजनांची काही सामाजिक कामे अशी आहेत की कोणालाही हेवा वाटेल. त्यांनी जवळपास ४० ते ५० अनाथ मुलांना दत्तक घेतलेले आहे. त्यांचा शैक्षणिक व दैनंदिन खर्च महाजन स्वतः पेलतात. त्यांचे हे कार्य फार कुणाला ठाऊक नाही.
संकटकाळात असलेल्या लोकांच्या मदतीला ते हिरिरिने धावून जातात. लोकांच्या वैद्यकीय मदतीसाठी त्यांनी स्वतःची अशी यंत्रणा तयार केली आहे. त्यांच्याकडे दोन वेळा वैद्यकीय शिक्षण खाते होते. पण या खात्याचे मंत्रीपद असो किंवा नसो ते आरोग्य सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असतात. विवाहसारख्या कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावतात. विवाहाच्या हंगामात ते एकाच दिवसात अगदी ४० ते ५० विवाह सोहळ्यांना हमखास हजेरी लावतात. ते सतत हसतमुख असतात. कामाचा निपटारा वेगाने करतात. लोकांच्या कामांविषयी ते सकारात्मक असतात.
त्यांच्या बंगल्यावर सामान्य लोकांना मुक्त प्रवेश असतो. गावच्या कानाकोपऱ्यातून थकूनभागून आलेल्या सामान्य व्यक्तीला बंगल्यावरील हॉलमध्ये बसायला जागा मिळते. चहा व पाणी आवर्जून दिले जाते. बऱ्याचदा नाश्तासुद्धा दिला जातो. अनेक मंत्री असे आहेत की, त्यांच्या बंगल्यावर प्रवेशद्वारातून आत प्रवेश दिला जात नाही. अशा परिस्थितीत गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी सामान्य लोकांना मिळणारी वागणूक नाडलेल्या लोकांना थोडीतरी दिलासा देणारी ठरते.