32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्र'विशेष अधिवेशन घ्या,' जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘विशेष अधिवेशन घ्या,’ जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज मंगळवार (31 ऑक्टोबर) सातवा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी अन्न पाण्याच्या केलेल्या त्यागामुळे त्यांची प्रकृती फारच खालावली आहे. मराठा आरक्षणाबाबतीत सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. तर, दुसरीकडे काही ठिकाणी मात्र राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्याचे दिसत आहे. यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मानओज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाली. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले. जरांगे पाटील यांनी मात्र राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केल्यानंतर मध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना आरक्षण द्यावं. एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन आरक्षणावर चर्चा झाली. बाकी दुसरी काही झाली नाही. आपण त्यांना स्पष्ट सांगितलं की, नोंदीनुसार आरक्षण घ्यायला तयार नाही. समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट आराक्षण देण्याचा निर्णय घ्या. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. अर्धवट आरक्षण घेणार नाही. ते तुम्ही देऊ नका. स्पष्ट शब्दात सांगितलं,” असे ते म्हणाले.

“आम्ही आमच्या अभ्यासकांची 12 ते 1 वाजता बैठक बोलावली. त्यानंतर, आम्ही वकिलांशी चर्चा करणार आहोत. पण 83 क्रमांकावर ओबीसीतील जाती मराठा आणि कुणबी एकच असल्याचं म्हटलंय. 2004 चा जीआर दुरुस्त करा. कारण व्यवसायावर आधारीत जाती निर्माण झाल्या आहेत. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. त्याच धर्तीवर आरक्षण द्या. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही. तुम्ही कितीही बहाणे सांगितलं तरी ऐकणार नाही. असं मुख्यमंत्री शिंदे यांना आम्ही स्पष्ट सांगितलं आहे.”

“सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. कायदा पारित करण्यासाठी पुरावा आहे. फक्त समितीला राज्याचा दर्जा द्यायचा आहे. एका पुराव्यावरही आरक्षण देऊ शकता. तुमच्याकडे भरपूर पुरावे आहे. व्यवसाय शेती असल्याने अडचण येत नाही. कुणाचं आरक्षण कमी होणार नाही. 60 टक्के समाज ओबीसीत आहे. आम्ही थोडे आहोत. 5 कोटी मराठा आरक्षणात येत नाही. आम्ही थोडे आहोत. मराठवाडा आणि इतर भागातील आहे. ज्यांना प्रमाणपत्र हवं ते घेतील. ज्यांना नको ते घेणार नाही. कुणावर जोरजबरदस्ती नाही,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा 

मराठा आरक्षण आंदोलन का पेटलं? मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक

बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर, भुजबळांच्या कार्यकर्त्याचे हॉटेल पेटवले

गरीब मराठ्यांसाठी तुमचं असणं अपरिहार्य..असे जरांगेंना का म्हणाले प्रकाश आंबेडकर

विशेष अधिवेशनासाठी मविआची राज्यपालांना भेट

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सोमवारी (30 ऑक्टोबर) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनभर भेट घेऊन निवेदन दिले होते. राज्यपालांनी मराठा आरक्षण आंदोलनात मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेऊन विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी मागणी या निवेदनातुन करण्यात आली होती.


यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र कॉँग्रेस ही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “राज्यात सध्या मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून या समाज घटकांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी व संताप आहे. या समाजांकडून आरक्षणाची मागणी होत असताना सरकारी पातळीवर समाधानकारक काम होताना दिसत नाही. हे प्रश्न राज्यातील जनतेच्या हिताचे असून यावर विधिमंडळात चर्चा होऊन राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे हे जनतेला समजणे गरजेचे आहे म्हणून राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी मागणी राज्यपाल महोदय यांच्याकडे करण्यात आली आहे.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी