मुंबई पोलिस दलात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या गृह खात्याने घेतला असून मुंबई पोलिस दलात तीन हजार पोलिसांची कंत्राटी भरती करण्यात येणार आहे. राज्य सुरक्षा महामंडळातर्फे जास्तीत जास्त 11 महिन्यांच्या कंत्राटावर ही पोलिस भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांचे मनुष्यबळ अत्यंत कमी असून नवी भरती होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने पोलिस भरती करण्याचा निर्णय गृह विभाकडून घेण्यात आला आहे. यासाठी गृहखात्याकडून 30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गृह खात्याच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून राज्य सरकारवर जोरदार टीकेचे झोड उठले आहेत.
सण-उत्सवांच्या काळात मुंबई पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण पडतो. मनुष्यबळ कमी असल्या कारणाने मुंबईत सुरक्षा व्यवस्था पुरवण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. याच अनुषंगाने, राज्याच्या गृह खात्याने एक मोठा निर्णय घेत पुढील पोलिस भरती होईपर्यंत मुंबईत कंत्राटी पद्धतीने पोलिस भरती करण्याचे निश्चित केले आहे.
या कंत्राटी पोलिस भरतीत जास्तीत जास्त 11 महिन्याच्या कंत्राटा वर भरती केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारद्वारे 100 कोटी 21 लाख रुपयांची तरतूद तर या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी साठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही भरती राज्य सुरक्षा महामंडळांच्या जवानांतून केली जाणार आहे. हे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर सुरक्षा महामंडळाचे जवान पुन्हा आपल्या पूर्वीच्या सेवेत रूजू होतील.
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. राज्यातील तरुणांसाठी हा निर्णय अन्यायकारक असून तो मागे घ्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कंत्राटी पोलिस भरतीबाबत राज्य सरकारवर टीका करत आपल्या ट्विटर पोस्ट वर लिहिले , “एकीकडे पोलिस भरतीचा पेपर फुटतो, दुसरीकडे मुंबईत तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याची जाहिरात निघते. प्रामाणिकपणे मेहनत करून पोलिस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांचा विश्वासघात महायुती सरकार करत आहे. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची सुरक्षा कंत्राटदार पोलिसांकडे देणे कितपत योग्य आहे?”
एकीकडे पोलिस भरतीचा पेपर फुटतो,
दुसरीकडे मुंबईत तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याची जाहिरात निघते.प्रामाणिकपणे मेहनत करून पोलिस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांचा विश्वासघात महायुती सरकार करत आहे.
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची सुरक्षा कंत्राटदार पोलिसांकडे… pic.twitter.com/dPLDDaG3S0
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 12, 2023
“कंत्राटी भरती करण्यासाठी जे कारण सरकारने दिले आहे त्यात कुठला ही तर्क नाही. उत्सव काळात अतिरिक्त मनुष्यबळ लागेल हे सरकारला आता कळले का? पेपरफुटीची दखल घ्यायची नाही, शासकीय भरती टाळायची आणि कंत्राटी भरती करायची.”
“राज्य सरकारने कंत्राटी पोलिस भरतीचा निर्णय मागे घेऊन पोलीस भरतीचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा आणि भरतीसाठी प्रामाणिकपणे घाम गाळणाऱ्या युवक युवतींना पोलिस दलात संधी उपलब्ध करून द्यावी,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा
‘रोड टॅक्स देतो मग टोलचा भार कशाला’, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
भुजबळ खोटे बोलून शपथविधीला गेले, शरद पवारांचा पलटवार
यंदाही शिवाजी पार्कवर आवाज ठाकरेंचाच…
कंत्राटी पोलिस भरतीवरून नाना पटोले भडकले
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका करत प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले, “राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारने तरुणांच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नावर पाणी फेरले असून कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती सुरु करुन आरक्षणवरही घाव घातला आहे. सरकारचा हा निर्णय अत्यंत घातक व सुरक्षेच्यादृष्टीने गंभीर आहे. राज्यातील भाजपाप्रणित सरकार गुजरातच्या आऊट सोर्सिंगवर चालत आहे पण पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करुन तरुणांसोबतच महाराष्ट्राच्या सुरक्षेचा खेळखंडोबा करु नका, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
#Policebharati #कंत्राटी pic.twitter.com/R1xTyfY3AV
— Nana Patole (@NANA_PATOLE) October 12, 2023
ते पुढे म्हणाले की, मुंबई पोलीस दलात तीन हजार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर सरकारने काढला आहे. पोलीस दलासारख्या सुरक्षेसाठी महत्वाच्या असलेल्या खात्यात कंत्राटी पद्धतीने भरती करणे हे अत्यंत चुकीचे आहे. पोलीस दल, तहसीलदार अशी महत्वाचे पदे ओऊटसोर्सिंगने भरून सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात नावलौकिक आहे, कंत्राटी पोलीस भरती करुन भाजपा सरकार महाराष्ट्राच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजवत आहे. कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करून राज्यातील येड्याचे सरकार महाराष्ट्राला काळिमा फासण्याचे काम करत आहे, हे काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही.”