अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला राज्य सरकारमध्ये सामील होऊन 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली होती. आता, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शरद पवार गटानेही ट्विटरवर एक पोस्ट शेयर करून अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हासाठी तसेच अजित पवार गटातील आमदारांवर आपत्रतेची कारवाई करण्यासाठी सध्या कायदेशीर लढाई चालू आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करतच असतात. त्यातच, आता दोन्ही गटांमध्ये ट्विटर युद्ध सुरू झाले आहे.
शिवसेना – भाजपा युतीच्या राज्य सरकारमध्ये अजित पवार 9 आमदारांसह 2 जुलै 2023 रोजी सामील झाले होते. मंगळवारी, (१० ऑगस्ट) सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण झाले. यानिमित्ताने, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी ‘X’ (ट्विटर) वर एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये अजित पवार यांनी राज्य सरकारमध्ये सामील होण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली. यावर, शरद पवार यांच्या गटाने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
१०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण… https://t.co/SrCeN1iao9 pic.twitter.com/WGIhMcYyrh
— NCP (@NCPspeaks) October 10, 2023
शरद पवार गटाकडून अजित पवारांना उत्तर
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरील या पोस्टमध्ये लिहिले आहे, “पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा कधीच दिल्लीच्या तख्तापुढे आपला महाराष्ट्र स्वाभिमान गहाण ठेवत नाही. जो तुम्ही गेले १०० दिवस गहाण ठेवलात… कितीही मोठं संकट आलं तरी, विचारांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून कुणापुढे न झुकता महाराष्ट्राच्या हिताचा ध्यास अहोरात्र बाळगण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व शरदचंद्र पवार साहेबांमध्येच आहे,”
तसेच, गेल्या 100 दिवसांतील राज्य सरकारच्या काही निर्णयांवर तसेच राज्यात झालेल्या काही दुर्दैवी घटनांची यादी प्रसिद्ध करत, ‘१०० दिवसांचं कर्तुत्व सांगावं लागणं यातच तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख्ख दिसून येत आहे…..’ असा मजकूर सोबत जोडला आहे.
- 100 दिवस छत्रपती – फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे….
- 100 दिवस मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचे….
- 100 दिवस वारकऱ्यांवर, मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या नतद्रष्ट्यांसोबतचे….
- 100 दिवस रुग्णालयांतील मृत्यूकांडास जबाबदार असंवेदशनील सरकारसोबतचे…..
- 100 दिवस महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार, प्रकल्प हिरावून घेणाऱ्या महाराष्ट्रविरोधकांसोबतचे…..
- 100 दिवस माताभगिनींवर अन्याय करणाऱ्या वृत्तीसोबत राज्यकारभार करण्याचे…..
- 100 दिवस मराठा, ओबीसी, धनगर, लिंगायत, समाजाचे आरक्षण रखडवणाऱ्या आरक्षणविरोधकांसोबतचे….
- 100 दिवस मराठी अस्मितेची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांसोबतचे…..
काय म्हटले होते अजित पवार?
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श, फुले-शाहू- आंबेडकरांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोककल्याणाचे धोरण यांचा वारसा जपला आहे.”
“महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले आहेत. अशा प्रकारचे निर्णय हे त्या त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २ जुलै २०२३ रोजी महायुती सरकारमध्ये सामील झाला.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सरकारमध्ये सामील होऊन, आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्तानं आपल्या सर्वांशी साधलेला हा पत्रसंवाद.#वसाविकासाचा_विचारबहुजनांचा pic.twitter.com/cdzpoI6dGr
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 10, 2023
“वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेलं ‘बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व’ हे सूत्र माझी प्रेरणा आहे, हे मी अनेकदा वेगवेगळ्या मंचांवर मांडले आहे. याच भूमिकेतून महापुरुषांचा आदर्श घेत लोककल्याणासाठी हाती घेतलेला ‘वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा’ हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे सत्तेत असण्याचे सूत्र राहणार आहे.”
हे ही वाचा
औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरप्रकरणी पडला हरकतीचा पाऊस
सत्तेतील ‘शंभरी’नंतर अजितदादांचं मोठं विधान, यशवंतरावांचा वारसा जपणार, जनतेशी पत्रातून संवाद
‘शरद पवार जिथे सभा घेतील तिथे…’ अजित पवारांचं स्पष्ट वक्तव्य
“येत्या काळात राष्ट्रवादी वर्ष काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या युवकांच्या, महिलांच्या तसेच विविध समाजघटकांच्या हितांचे रक्षण करण्याच्या भूमिकेतून राज्य सरकारमध्ये कार्यरत असेल याची प्रचिती मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या कामातून तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा तुम्हा सर्वांना शब्द आहे.”
“नव्या सरकारमध्ये सामील होत असताना मी वर मांडलेली भूमिका आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. आम्ही याच मार्गावर गेले शंभर दिवस वाटचाल केली आहे आणि यापुढेही करीत राहू.”