राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर (Maharashtra Grampanchayat Election Result 2023) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रविवारी, (5 ऑक्टोबर) झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची सोमवारी, (6 ऑक्टोबर) मतमोजणी झाली. मतमोजणीनंतर राज्यातील सर्वच पक्षाचे नेते आपापल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा दावेदार झाल्याचे सांगत होते. त्यातही, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे राज्यात आपल्या पक्षाचे सर्वाधिक सरपंच विजयी झाल्याचे सांगितले आहे. तसेच भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीला सर्वाधिक मतदान झाल्याचा दावाही केला आहे. त्यावर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेत जोरदार टीका केली. शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी यावर टीका करत, “महापालिकांच्या निवडणुका घ्यायला हातभर फाटते, ते ग्राम पंचायत निवडणुका जिंकल्याचा गुलाल उधळत आहेत,” अश्या शब्दात टीका केली आहे.
भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल सुरू असतानाच सोशल मिडियाच्या माध्यमातून राज्यात भाजपच आघाडीवर असल्याचे सांगत होते. राज्यात एकूण 2359 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी, भाजपने 655 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार गट) 392 तर शिवसेना 289 जागा जिंकल्या आहेत. महायुतीने एकूण 1,336 जागांवर बाजी मारली आहे. तर दुसरी कडे कॉँग्रेसने 271 जागा, राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार गट) 145 जागा तर शिवसेना उबाठा गटाने 110 जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला एकूण 526 जागा जिंकता आल्या आहेत. या निकालावरून राज्यभरातील विविध पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता संजय राऊत यांनीही उडी घेत भाजपवर टीका केली आहे.
काळ मोठा कठीण आला आहे.
राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे.
ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करीत आहेत.या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे.
जे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका… pic.twitter.com/PeIjd0P7Ge— Sanjay Raut (@rautsanjay61) November 7, 2023
संजय राऊत यांनी आपल्या “X” अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्विटर) ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “काळ मोठा कठीण आला आहे. राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे. ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करीत आहेत.या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे.”
पुढे ते म्हणतात, “जे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका घेण्यास घाबरतात.मुंबई सह 14 महानगर पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते, ते ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा गुलाल उधळत आहेत. याला काय म्हणावं? हास्य जत्राच!”
हे ही वाचा
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नेमकं कोण जिंकलं?
धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत
MPSC अध्यक्ष आहेत कुठे? रोहित पवार यांचा सवाल
ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावरून राजकीय नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक चालूच आहे. काल, कॉँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी, “ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांबद्दल भारतीय जनता पक्षाने केलेला दावा खोटा आणि हास्यास्पद असून ही निवडणूक चिन्हांच्या आधारे घेतली जात नाही,” असे व्यक्तव्य केले होते. तर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनीसुद्धा, “ग्रामपंचायत निकालांवरून कुणाचे वर्चस्व सिद्ध होत नाही,” असे व्यक्तव्य केले होते.