टिम लय भारी
मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्व 227 जागांवर लढण्यासाठी तयार आहे, असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केले. भाई जगताप यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेब यांच्या सर्व स्मृतिदिनाला मी नेहमी येतो, राजकारणाच्या पलिकडे काही व्यक्तींचं स्थान असतं, इथे प्रेरणा मिळते, आज आणि उद्या सर्व महान व्यक्तींच्या प्रेरणा स्थळावर जाणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.
मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भाई जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. त्यावेळी महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्यासंदर्भात चाचपणी झाल्याची चर्चा होती. मात्र, आता भाई जगताप यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा इरादा जाहीर केला आहे.
मराठा आरक्षण हा भावनिक आणि गुंतागुंतीचा विषय आहे. आरक्षण देण्याचं काम महाविकास आघाडीने केले आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील समाजात या मुद्द्यावरुन तेढ निर्माण करु नये, अशी माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती असल्याचे भाई जगताप यांनी म्हटले.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. आज शेतकरी आंदोलनाचा 29 वा दिवस आहे. आतापर्यंत 25 पेक्षा अधिक शेतकरी शहीद झाले आहेत. महाराष्ट्रात भाजपची सत्ता असताना शेतक-यांचा संप झाला, राज्यात पूर आला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी केवळ हवाई पाहणी केली. त्यांनी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे वाटप झाले नाही, असा आरोप भाई जगताप यांनी केला.
विमा कंपन्या केंद्र सरकारने ठरवल्या असल्याने त्याबाबत त्यांनी बोलू नये. फडणवीस यांची केविलवाणी स्थिती झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांसाठी 10 हजार कोटी जाहीर केले त्यातील साडेसात कोटी रुपये वर्ग झाल्याचा दावा भाई जगताप यांनी केला.