मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई आणि उपनगर भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात आज मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्र विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, आणि रायगड जिल्ह्यातही मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याच बरोबर 30 जूनपासून मुसळधार पावसाची तीव्रता हळूहळू कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मुसळधार पावसामुळे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होण्यास सुरवात झाली आहे. कोपरी ब्रिज ते मुलुंड टोल नाका पर्यंत, भांडुप पंपिंग, ऐरोली सिग्नल जवळ, घाटकोपर रमाबाई नगर ते छेडा नगर, सुमन नगर या परिसरांमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि जोगेश्वरी स्थानकांनदरम्यान असलेल्या अंधेरी सबवे खाली तीन ते चार फुट पाणी भरल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला होता.
पावसाचा जोर वाढल्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल 15 मिनिट उशिराने तर पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिट उशिराने सुरू आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिट उशिराने सुरू आहे. तसेच अंबरनाथ बदलापूर येथे सुद्धा मुसळधार पाऊस होत असून कल्याण डोंबिवलीमध्ये रात्रीपासून पाऊस कोसळत आहे.
हे सुद्धा वाचा:
नरेंद्र मोदी मणिपूरला जळत ठेवून अमेरिकेच्या दौऱ्यावर चमकोगिरी करत होते; नाना पटोले यांची जळजळीत टीका
शिंदे-फडणवीस सरकारकडून आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठींचे निलंबन मागे
संजू राठोडच्या ‘नऊवारी साडी’ या गाण्याने प्रेक्षकांना घातली भुरळ
मान्सून उशिरा हजर झाला असाला तरी, 24 ते 29 जून दरम्यान 95 टक्के पाऊस झाला असल्याचे हवामान विभागाने सांगितले. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये गेल्या 24 तासात जोरदार पाऊस झाला आहे. यापैकी वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा आणि भातसा येथे अनुक्रमे 144 मिमी,137 मिमी, 109 मिमी, 137 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याच बरोबर मुंबई मधील विहार आणि तुळशी तलावात 159 मिमी, 235 मिमी, पाऊस पडला. असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.