31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईअंबानींना धमकी देणारे आहेत तरी कोण?

अंबानींना धमकी देणारे आहेत तरी कोण?

जगविख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांना ईमेलवरून धमकी देणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. एक आठवड्यापासून मुकेश अंबानी यांना धमकीने एकूण सहा ईमेल आले होते. पहिल्या ईमेलमधून २० कोटी रुपयांची मागणी केली होती. तर शेवटच्या धमकीतून ५०० कोटींची रक्कम मागितली होती. एवढेच नाही तर पैशांची व्यवस्था तातडीने न केल्यास हत्या करण्याचीही धमकी देण्यात आली होती. शेवटच्या ईमेलच्या धमकीत तर ‘शक्य असेल तर मला पकडा’ असे आव्हान दिले होते. मात्र, मुंबई गुन्हे शाखेने अत्यंत कौशल्याने तपास करत दोघांना अटक केली आहे. त्यातील एकजण गुजरातचा तर दुसरा तेलंगणामधील आहे.

श्रीमंताची यादी तसेच उद्योगसमूहाच्या विस्तारसंदर्भात प्रकाशझोतात असणारे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी गेल्या आठवड्यापासून चर्चेत आले होते. तेही त्यांना आलेल्या धमक्यांच्या ईमेलमुळे. त्यांना २७ ऑक्टोबरला पहिला धमकीचा ईमेल आला होता. त्यानंतर २ नोव्हेंबरपर्यंत एकूण धमक्यांचे सहा ईमेल आले होते. याप्रकरणी त्यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर तपासाची सूत्रे लगेचच हलली होती. या धमक्यांमुळे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जीवावर कोण उठले आहे? याची सरकारला चिंता लागून राहिली होती.

दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यातील पहिला रजवीर खांत (वय २१) याला गुजरातच्या गांधीनगरमधून अटक करण्यात आली आहे. तर दुसरा गणेश रमेश वनरपथी (वय १९) याला तेलंगणाच्या वारांगलमधून अटक केली आहे. दोघांनाही कोर्टाने ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गणेशचा आयपी अॅड्रेसच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. तर रजवीर खांत याला तंत्रज्ञानाची आवड आहे. त्याने धमकीचा ईमेल पाठवताना ‘शक्य असेल तर मला पकडा’, अशी आव्हानाची भाषा केली होती. रजवीरने आणखी एका उद्योगपतीला धमकीचा ईमेल पाठवला असल्याचीही माहिती मिळते.

‘अँटिलिया’बाहेर स्फोटकांची गाडी

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती मुकेश अंबानी यांना याआधीही अनेकदा धमक्या आल्या होत्या. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर एका वाहनात जिलेटिनच्या २० कांड्या आढळल्याने देशात खळबळ उडाली होती. त्याचे गूढ अजून उकललेले नसताना पुन्हा धमक्यांचे ईमेल पाठवून कोट्यवधींची खंडणी मागितल्याने पोलीस हैराण झाले होते.

पहिल्या ईमेलमध्य़े ‘जर तुम्ही २० कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला ठार मारू. भारतात आमचे सर्वोत्तम शूटर्स आहेत’ (If you don’t give us Rs 20 crore, we will kill you. We have the best shooters in India) अशी धमकी दिली होती.

बिहारमधून धमकी

गेल्या वर्षीही मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून एकाला अटक केली होती. त्याने सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय उडवण्याची धमकीही दिली होती.

श्रीमंतांची यादी आणि धमकीचा ईमेल

हरून इंडियाने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली. यात मुकेश अंबानी हे श्रीमंत भारतीय असल्याचे यादीत होते. मुकेश अंबानी यांची ८ लाख ८ हजार ७०० कोटींची संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले. ही यादी जाहीर झाल्यानंतर दोन आठवड्यांत त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी