टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता मुंबईत पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मार्चमध्ये मुंबईत ज्या प्रकारे निर्बंध लावले होते, तसेच कठोर निर्बंध आता ही लागण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत मोठे विधान केले आहे.
महापौर किशोर पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे विधान केले आहे. मुंबईत कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे मुंबईत मॉल, मंदिर आणि गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लावले जाऊ शकतात. तसेच दुकाने आणि बाजरपेठा एक दिवस आड सुरू करण्यात येईल, असे संकेत ही त्यांनी दिले आहेत. त्याशिवाय मुंबईतील लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईत गेल्यावर्षीच्या मार्चसारखीच परिस्थिती निर्माण होणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे.
रोज ७–८ हजार रुग्णांची भर
मुंबईत सक्रिय रुग्णांमध्ये एका महिन्यात ४५ हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासमोर आव्हान निर्माण झाले आहे. मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून कोरोना विरोधातील लढा सुरू आहे. पालिका आणि राज्य सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे डिसेंबर अखेरीस कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्रे होते. मात्र फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कोरोनाने कहर केला असून रुग्णांची रोजची संख्या सात ते आठ हजारावर पोहोचली आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
एका महिन्यात रुग्णसंख्या वाढली
मार्च रोजी मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या ९,६९० होती. १ एप्रिलपर्यंत म्हणजे अवघ्या महिन्याभरात ही संख्या तब्बल ५५ हजार पाच एवढी झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे, असे ही त्या म्हणाल्या.
२४ तासात ८ हजार रुग्ण
मुंबईत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल ८ हजार ६४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ हजार ३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात मुंबईत १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी १४ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये १२ पुरुष तर ६ महिलांचा समावेश आहे. मुंबईत सध्या ५५ हजार ५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर चिंताजनक बाब म्हणजे रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर आला आहे. २५ मार्च ते ३१ मार्च दरम्यानचा कोरोना वाढीचा दर पाहिला तर तो १.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
सक्रिय रुग्णांची सद्यस्थिती
- १ मार्च – ९,६९०
- १५ मार्च – १४,५८२
- २५ मार्च – ३३,९६१
- १ एप्रिल – ५५,००५