टीम लय भारी
मुंबई :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे संकट राज्यावर असताना आता दुसरे संकट राज्यावर आले आहे. ते म्हणजे राज्यात फक्त सात-आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तरुण-तरुणींना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. स्वेच्छा आणि निस्वार्थी भावनेने रक्तदान करा, असे गृहनिर्माण मंत्री आवानह जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून हे आवाहन केले आहे. राज्यात केवळ सात-आठ दिवस पुरेल इतका रक्तसाठा उरला आहे. आज कोरोनाला न घाबरता, सोशल डिस्टसिंग पाळून खासकरुन तरुण-तरुणींनी बाहेर पडून रक्तदान करावे. कुणाचे तरी प्राण वाचविण्यासाठी आपलं रक्त उपयुक्त ठरेल, ही भावना मनात ठेवून रक्तदान करा, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.
There is an acute shortage of blood in #Maharashtra.Blood banks are running dry & we have blood only to suffice for next 7 to 8 days. It’s dire need of the hour for people to come forward & #donateblood
I appeal to the youth :- ‘voluntarily & selflessly’ #DonateBloodSaveLives— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 1, 2021
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रक्ताची मागणीही वाढली आहे. परंतु, संसर्गाच्या भीतीने सध्या रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. मागील वर्षी अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी कालच राज्यातील रक्तसाठ्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. सध्या संपूर्ण लॉकडाऊन नसल्यामुळे लोकांनी आपापल्या परिसरात रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन शिंगणे यांनी केले आहे.
मुंबईत कहर वाढला
मुंबईत कोरोनाच्या सक्रीय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात तब्बल ४५ हजारांहून अधिक सक्रीय कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईची वाटचाल पुन्हा एकदा हॉटस्पॉटकडे होताना पाहायला मिळत आहे. राज्यात काल तब्बल ४३ हजार १८३ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दररोज ७ ते ८ हजार कोरोनाबाधित आढळत आहे. तसेच मुंबईतील सक्रीय रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
गेल्या १ मार्च २०२१ मध्ये ९ हजार ६९० कोरोनाचे सक्रीय रुग्ण होते. तर काल १ एप्रिलला महिनाभरात ही संख्या तब्बल ५५ हजार ००५ वर पोहोचली आहे. त्यामुळे वाढणारी रुग्णसंख्या ही मुंबईकरांच्या चिंता वाढवणारी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. तसेच मुंबईत ठिकठिकाणी आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
२४ तासात ८ हजार रुग्ण
मुंबईत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल ८ हजार ६४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ हजार ३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात मुंबईत १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी १४ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये १२ पुरुष तर ६ महिलांचा समावेश आहे. मुंबईत सध्या ५५ हजार ५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर चिंताजनक बाब म्हणजे रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर आला आहे. २५ मार्च ते ३१ मार्च दरम्यानचा कोरोना वाढीचा दर पाहिला तर तो १.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे.