सध्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात एकुण 3 टी20 सामन्यांची (T20 Series) मालिका आयोजित करण्यात आली आहे. यातील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहालीच्या आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाला (Indian Cricket Team) 4 विकेट्सने लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर भारतीय संघ 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. या पराभवानंतर भारतासाठी मालिकेतील प्रत्येक सामना करो वा मरोचा झाला होता. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार (23 सप्टेंबर) रोजी नागपूर येथे खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने मुसंडी मारत विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. विशेष म्हणजे पावसाच्या कारणास्तव दुसरा टी20 सामना केवळ 8-8 षटकांचा नियोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील नागपूर येथे दुसरा टी20 सामना सुरू होण्यापूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे मैदानावरील परिस्थिती खेळण्यासाठी योग्य नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर सामन्यातच्या नियोजित वेळेपेक्षा तब्बल 3 तास उशीरा खेळ सुरू करण्यात आला. यादरम्यान पंचांनी 3 वेळा मैदानाचे मूल्यांकन केले. त्यानंतर सामना सुरू होण्यास उशीर झाल्याच्या कारणाने खेळातील षटके कमी करत प्रत्येक संघाला 8 षटके अशा परिस्थितीत सामना पूर्ववत करण्यात आला. भारतासाठी या महत्त्वपूर्ण अशा सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात दुखापतीनंतर पुनरागमन करण्यासाठी उतरला.
सामना सुरू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्याच षटकापासून तुफानी फलंदाजी करण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने नियोजित 8 षटकात 5 गडी गमावत 90 धावा ठोकल्या. यावेळी ऑस्ट्रेलियासाठी यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने तुफानी फलंदाजी करत केवळ 20 चेंडूत नाबाद 43 धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार ऍरॉन फिंचने देखील 15 चेंडूत 31 धावा केल्या. तर भारतासाठी अष्टपैलू अक्षर पटेलने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत निर्धारित 2 षटकांत केवळ 13 धावा देत 2 बळी घेतले.
हे सुद्धा वाचा –
Amit Shah Bihar Visit: ‘नितीश कुमारांनी भाजप आणि बिहारच्या जनतेशी विश्वासघात केला’
Congress President Election: गांधी परिवारातून कोणीही काँग्रेसचा अध्यक्ष बनणार नाही – अशोक गहलोत
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 8 षटकांत 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि उपकर्णधार केएल राहुलने (KL Rahul) सुरुवातीपासूनच हाणामारी करण्यास सुरुवात केली. यावेळी केएल राहुलने 6 चेंडूत 10 धावा केल्यया. याशिवाय रोहित शर्माने 20 चेंडूत नाबाद 46 धावा केरत भारताला विजय मिळवून दिला. याशिवाय भारतासाठी विराट कोहलीने (Virat Kohli) 6 चेंडूत 11 आणि दिनेश कार्तिकने शेवटी 2 चेंडूत 10 धावांचे योगदान दिले. तर ऑस्ट्रेलियासाठी फिरकीपटू ऍडम झम्पाने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 2 षटकांत केवळ 16 धावा देत 3 बळी घेतले.
दरम्यान, मालिकेत सध्या दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी (25 सप्टेंबर) रोजी हैदराबाद येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिकेचा चषक आपल्या नावावर करेल. त्यामुळे सध्या क्रिकेटप्रेमींच्या नजरा रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टी20 सामन्यावर खिळल्या आहेत.