लयभारी न्यूजनेटवर्क
अहमदनगर : ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) कायद्याची अधिसूचना शुक्रवार (१० जानेवारी) पासून देशात लागू करण्यात आली तरी आम्ही पहिल्यापासून या कायद्याचा विरोध करतं असून आमचा विरोध कायम राहणार आहे.’ असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री आणि कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. ‘या कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली असली तरी महाराष्ट्रात हा कायदा लागू होऊ देणार नाही.असंही ना. थोरात म्हणाले.
नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी करण्याआधीच महाराष्ट्रासह देशभरात आंदोलन सुरु आहेत. एकीकडे देशभरात आंदोलनं सुरु असताना दुसरीकडे केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता या गोष्टीला विरोधी पक्षाने आणि प्रामुख्याने काँग्रेसने जोरदार विरोध सुरु केला आहे. याचविषयी प्रतिक्रिया देताना मंत्री बाळासाहेब थोरात असं म्हणाले की, ‘महाराष्ट्रात हा कायदा लागू करणार नाही.’
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशाच्या विविध भागात विरोध होत आहे. गृहमंत्रालयाच्या सूचनेनंतर हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला आहे. विरोधी पक्ष एकीकडे म्हणत आहेत की हा कायदा संविधानाच्या मूलभूत भावनांशी खेळणारा आहे. तर दुसरीकडे, कोणताही युक्तीवाद नसल्यास विरोधी पक्ष सर्वसामान्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा सरकारचा तर्क आहे. परंतु पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील धार्मिक छळ सहन करणाऱ्या गैर-मुस्लिम अल्पसंख्याकांशी दशकांपूर्वी केलेले वचन आम्ही अंमलात आणलं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. यामुळे सध्यातरी देशात चांगलाच विरोध होत आहे.