लय भारी न्यूज नेटवर्क
बीड : रेडिओ जॉकी मलिष्का हिने दोन वर्षांपूर्वी मुंबईच्या समस्यांवर एक गीत आणले होते. हे ‘गोल गोल’ गीत चांगलेच लोकप्रिय झाले होते. त्या पद्धतीने आता धनंजय मुंडे यांनी ‘गोल गोल’ गीत प्रचारात आणले आहे. यात परळी मतदारसंघातील समस्यांचा पाढा वाचण्यात आला आहे. या समस्या सोडविण्यासाठी पंकजा मुंडे यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. उलट पंकजाताई नुसतं भावनिक बोलून मते मिळवतात, असे या गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पंकजाताईंचे गाण्यात कुठेही नाव घेतलेले नसले तरी त्यांनाच या गाण्यातून टोले हाणल्याच लक्षात येत आहे.
अंबाजोगाई येथील रखडेला रस्ता, कारखान्यांच्या वाजलेल्या तीन तेरा, कामगारांना वेळेवर मिलत नसलेले पगार, उड्डाण पुलांचा अभाव, पोहनेर आदर्श करतो म्हणाले होते, पण ते केलेच नाही. नुसतीच गाजरे दाखवतात. कालव्यांची दुरूस्ती नाही, प्यायला पाणी नाही, कुठलीही योजना आली नाही, एखादा नवीन प्रकल्प आला नाही. विकासाचा सारा बट्ट्याबोळ झाला आहे असे मुद्दे या गितातून मांडण्यात आले आहेत. गीत चांगले श्रवणीय झाल्याने ते जोरात व्हायरल झाले आहे. धनुभाऊंच्या पाठीमागे राहा, असेही शेवटी या गितातून सांगण्यात आले आहे.